आता मी निजधामाला जायला मोकळा झालो
अध्याय एकोणतिसावा
श्रीकृष्णाचे निधन झालेले आहे असे विदुरांनी सांगूनसुद्धा उद्धव अविचल होता. त्यावरून विदुरांच्या लक्षात आले की ह्याच्यावर कृपामूर्ती श्रीकृष्ण प्रसन्न झालेले आहेत. त्यामुळे ह्याची मोह व ममतेतून सुटका झाली आहे. दोघेही आत्मस्वरूप झाले आहेत. त्यामुळे त्यांची ताटातूट होणे शक्य नाही. त्यामुळे श्रीकृष्णाचे निधन झाल्याने त्यांची सगुण मूर्ती लोप पावली आहे हे समजल्यावर ह्याच्या मन:स्थितीत काहीही फरक पडलेला नाही. ह्याला बोलताना शब्दाचा आधार लागत नाही, जमिनीचा आधार न घेता हा चालतो, नामरूपाशी एकरूप झालेला असला तरी नामरूपाला सोडत नाही, जीभेशिवाय रस चाखू शकतो, डोळ्यांशिवाय पाहू शकतो, इंद्रीयांशिवाय निजात्मसुखाचा उपभोग घेतो. हे सर्व पाहून ह्याला आत्मज्ञान झालेले आहे हे विदुरांनी ओळखले. निर्विकल्प असलेल्या व निजबोधात राहून भक्ती, ज्ञान, वैराग्य ह्यांनी परिपूर्ण असलेल्या उद्धवाला पाहून विदुरांना अतिशय आनंद झाला. त्या आनंदातून भानावर आल्यावर ते उद्धवाला म्हणाले, तुझ्यावर हृषीकेशी प्रसन्न झाल्याने तुला त्याच्याकडून ब्रह्मज्ञान प्राप्त झालेले आहे. तू धन्य झाला आहेस. आता त्या ब्रह्मज्ञानाचा मला उपदेश कर. विदुरांची विनवणी ऐकून उद्धव त्यांना म्हणाला, निजधामाला जात असताना शेवटी कृपानिधान श्रीकृष्णाला तुमची आठवण झाली. त्यामुळे तुम्ही धन्य झाला आहात पण भगवंतांनी मैत्रेयाला तुम्हाला ब्रह्मज्ञान द्यायला सांगितले आहे. जर कृष्णाने मला आज्ञा केली असती तर मी तत्काळ तुम्हाला तत्वबोध केला असता. तुमचा परमार्थ साधून देणारा सद्गुरु मैत्रेय आहे. उद्धवाचे हे बोलणे ऐकून विदुरांना गहिवरून आले. मरतेसमयी श्रीकृष्णाने त्यांची आठवण काढली हे ऐकून ते आश्चर्यचकित होऊन म्हणाले, अरे मी चिलटासमान असून रंकात अति रंक आहे. अत्यंत क्षुद्र अशा माझी यदुनायकाने आठवण काढावी हे माझ्यावर त्यांच्या असलेल्या अलौकिक कृपेचे लक्षण होय. अंतिमसमयी नारायणाचे स्मरण करावे असे शास्त्रवचन आहे ते सोडून श्रीकृष्णाला माझी आठवण झाली हे माझे केव्हढे सुदैव. देवकी वासुदेवाची किंवा बलराम वा पांडवांची आठवण न होता ह्या दासीपुत्र विदुराची कृपाळू हृषीकेशाला आठवण व्हावी ह्यावरून कृपासिंधु श्रीकृष्ण भक्तांचा कसा सांभाळ करतात हे लक्षात येते. येथे एक शंका वाचकांच्या मनात येईल की, उद्धव तर द्वारकासोडून बद्रिकाश्रमात जायला निघालेला होता व श्रीकृष्ण द्वारकेत होते मग श्रीकृष्णाच्या निधनसमयी त्या ठिकाणी उपस्थित नसताना तेथे काय काय घडलं हे उद्धवाला कसं माहित झालं असेल? त्याचं उत्तर असं की, उद्धव बद्रीकाश्रामाच्या दिशेने जाण्यास निघाला खरा पण वाटेतच त्याला श्रीकृष्णाची अतिशय आठवण येऊ लागली. तो मनात म्हणाला श्रीकृष्ण चरित्राची गोडी अवर्णनीय आहे. त्यापुढे तीर्थाची काय किंमत? आयुष्यभर मी श्रीकृष्णाबरोबर राहिलो व आता त्याच्या निधनसमयी मी तिथे नेमका हजर नाही ह्याचे मला फार वाईट वाटते. मी परत द्वारकेत गेलो तर श्रीकृष्ण मला तिथे राहू देणार नाही. म्हणून उघडपणे द्वारकेत न जाता उद्धव गुप्तपणे द्वारकेत गेला. तेथे पाहतो तो काय समस्त यादव कुळाचा घात झालेला दिसला. सर्व कुळाचा नाश झालेला पाहून श्रीकृष्ण अश्वत्थ वृक्षाच्या तळी बसले होते. त्यांचे चरण एका व्याधाने बघितले त्याला ते हरणाच्यासारखे मऊशार वाटले व त्याचा वेध घेण्यासाठी त्याने बाण सोडला. बाण लागल्याबरोबर आपण आता नि:संशय कृतकार्य झालो ह्या विचाराने देवांना अतिशय सुख वाटले. ते स्वत:शीच म्हणाले, आता मी निजधामाला जायला मोकळा झालो. इतर कुणाला बाण लागला असता तर त्या आघाताने तो कासावीस झाला असता पण श्रीकृष्णांना देहाच्या अस्तित्वाचे काहीच कौतुक नसल्याने त्यांना बाणाच्या आघाताचे काहीच दु:ख झाले नाही.
क्रमश: