साहेब नाहीत, उद्या या...उत्तराने जनता त्रस्त
मनपाच्या कारभारामुळे नाराजी
बेळगाव : महानगरपालिका किंवा इतर कार्यालय असो सर्वसामान्य जनतेची कामे प्रलंबित ठेवण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यातच विविध सुट्या आल्याने आणखी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. लोकसभा निवडणूक होणार आहे. त्या कामामध्ये अधिकारी गुंतले आहेत. जनतेच्या कामांकडे मात्र दुर्लक्ष होत असून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या कामामध्ये अधिकारी गुंतले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेची कामे प्रलंबित ठेवली जात आहेत. त्या ठिकाणी कार्यरत असलेले कर्मचारी साहेब नाहीत उद्या या, असे उत्तर देत आहेत. त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. मनपा आयुक्तांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. सध्या निवडणुकीच्या कामासाठी एक खिडकी योजना सुरू केली आहे. त्या ठिकाणीच हे कर्मचारी दिवसभर थांबून राहत आहेत. कर्मचाऱ्यांवरही निवडणुकीचा ताण पडत आहे, हे खरे आहे. मात्र नागरिकांची कामे यामुळे प्रलंबित राहत आहेत. घर बांधण्यासाठी परवानगी असो किंवा दुकानांचा परवाना हवा असेल तर आठ दिवसांनी या, अशी उत्तरे दिली जात आहेत. यामुळे जनतेचे हेलपाटे होत आहेत. निवडणूक झाल्यानंतरच कामात सुसूत्रता येणार का? असा प्रश्नही आता उपस्थित होत आहे. एकूणच या निवडणुकीमुळे विविध समस्यांना जनतेला तोंड द्यावे लागत आहे.