For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केंद्रीय अर्थसंकल्पातून कर्नाटकाची निराशा

06:36 AM Jul 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
केंद्रीय अर्थसंकल्पातून कर्नाटकाची निराशा
Advertisement

नव्या योजना, विशेष पॅकेजची घोषणा नाही : केवळ बेंगळूर-हैदराबाद औद्योगिक कॉरिडॉरला पॅकेज

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी चालू आर्थिक वर्षातील अर्थसंकल्प लोकसभेत मांडला. अर्थसंकल्पात अनेक नव्या योजना आणि विशेष पॅकेजच्या घोषणेची अपेक्षा असलेल्या कर्नाटकाच्या पदरी निराशा आली आहे. कर्नाटकासाठी कोणतीही नवी योजना जाहीर करण्यात आलेली नाही. केवळ बेंगळूर-हैदराबाद औद्योगिक कॉरिडॉर विकासासाठी विशेष पॅकेज घोषित करण्यात आले आहे. या पॅकेजशिवाय राज्यातील प्रस्तावित योजनांना प्राधान्य देण्यात आलेले नाही. यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात कर्नाटकाला पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अनेक योजना दिल्या जातील, अशी अपेक्षा होती. शिमोगा जिल्ह्यातील भद्रावती येथील व्हीएसआयएल कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी विशेष पॅकेज, भद्राकाठ योजनेची अंमलबजावणी, कावेरी नदीवर मेकेदाटू येथे जलाशय निर्मिती, रेल्वे, पाणीपुरवठा यासह अनेक योजनांना केंद्राकडून अनुदान मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरली आहे.BJP had given a guarantee to maintain 4 percent reservation for Muslims!

Advertisement

कर्नाटकाच्या हिताकडे दुर्लक्ष : सिद्धरामय्या

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्याच्या कोणत्याही मागण्यांची दखल न घेता निराशाजनक अर्थसंकल्प मांडला आहे. सीतारामन यांनी राज्याच्या हिताकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून जनतेच्या हाती ‘चंबू’ दिला आहे. पंतप्रधानांनी आपले अधिकार शाबूत राहण्याच्या उद्देशाने आंध्रप्रदेश आणि बिहार राज्यांना विशेष अनुदान दिले आहे, तर इतर राज्यांकडे दुर्लक्ष केले आहे, अशी टीका मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली आहे. केंद्राच्या 16 व्या वित्त आयोगाचे सदस्य 28 ऑगस्ट रोजी राज्य दौऱ्यावर येत आहेत. याप्रसंगी मागील वेळी राज्यावर झालेला अन्याय दूर करण्याची विनंती करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

दहा वर्षांच्या विकासाचे प्रतिबिंब अर्थसंकल्पात : बोम्माई

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला केंद्राचा अर्थसंकल्प भारताच्या भावी तरुणांचा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री व खासदार बसवराज बोम्माई यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील केंद्र सरकारच्या दहा वर्षांच्या आर्थिक सुधारणेमुळे भारत हा जगभरात नावलौकिक मिळविणारा देश ठरला आहे. याचे प्रतिबिंब अर्थसंकल्पात दिसून येत आहे. उत्पादन क्षेत्रात विशेषत: लघुउद्योगांवर अधिक भर देण्यात आला आहे. सेवा क्षेत्राच्या विस्तारालाही प्राधान्य देण्यात आले आहे. शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या तीन क्षेत्रांसाठी अधिक अनुदान देण्यात आले आहे, असे समर्थनही त्यांनी केले.

देशाचे भविष्य मजबूत करणारा अर्थसंकल्प : आर. अशोक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारने शेतकरीस्नेही, कराचा भार नसलेला आणि देशाचे भविष्य आणखी मजबूत करणारा अर्थसंकल्प सादर झाला आहे. निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प भारताला जगातील सर्वात तिसरी मोठी आर्थिक शक्ती म्हणून उदयाला येण्यास कारणीभूत ठरेल. शेतकरी, महिला, युवा समुदायांना अनुकूल होईल, अशा तरतुदी अर्थसंकल्पात आहेत, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी दिली आहे.

Advertisement
Tags :

.