नितीश कुमारांना होता धोरणात्मक विरोध : चिराग रालोआत
वृत्तसंस्था/ पाटणा
लोकजनशक्ती पक्षाचे प्रमुख चिराग पासवान यांनी मोठे वक्तव्य केले आहे. नितीश कुमार यांचे रालोआतील पुनरागमन हे आघाडीच्या वरिष्ठ सहकाऱ्यांकडून घेतलेला निर्णय आहे. आघाडीतील सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपचा हा निर्णय आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांना माझा धोरणात्मक विरा होता. आघाडीत संजदला सामील करण्याचा निर्णय माझा नव्हे तर भाजपचा होता, आम्ही या आघाडीत सामील आहोत. याचमुळे सर्वांनी मिळून या निर्णयाचे स्वागत केले आहे. सध्या माझे पूर्ण लक्ष स्वत:च्या पक्षाचे व्हिजन ‘बिहार फर्स्ट बिहारी फर्स्ट’वर असून याच दिशेने काम करत असल्याचा दावा चिराग यांनी केला आहे. नितीश कुमार हे आता आघाडीच्या विचारसरणीचे पूर्ण पालन करतील. रालोआ बिहारच्या विकासासाठी सातत्याने काम करत असल्याचे वक्तव्य चिराग यांनी केले आहे. चिराग हे जमुईचे खासदार आहेत. विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांच्या संजदच्या उमेदवारांच्या विरोधात चिराग पासवान यांनी स्वत:च्या पक्षाचे उमेदवार उभे केले होते. यामुळे संजदला फार मोठा आकडा गाठता आला नव्हता. यानंतर चिराग यांच्या पक्षात फूट पडली होती. यामागे नितीश कुमार यांचा हात असल्याचे बोलले जात होते.