नवा सूर्य
क्रिकेट आणि विक्रम हे समीकरणच मानले जात असले, तरी काही विक्रम हे ऐतिहासिकच असतात. यंदाच्या आयपीएलमध्ये गुजरातविऊद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या वैभव सूर्यवंशी याने वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी ठोकलेले तडाखेबंद शतक याच पठडीतले ठरावे. बिहारसारख्या राज्यातून पुढे आलेल्या वैभवचा हा पहिलाच आयपीएल हंगाम. हंगामातल्या तिसऱ्याच सामन्यात हा चिमुरडा 35 चेंडूत शतक साजरे करतो, आपली खेळी 7 चौकार आणि 11 षटकारांनी सजवतो आणि अख्खे मैदान गाजवतो, हे खरेतर अविश्वसनीय. परंतु, खेळामध्ये वयापेक्षा तंत्राला, गुणवत्तेला आणि टायमिंगला महत्त्व असते. वैभवने तेच दाखवून दिले. अर्थात याचे श्रेय त्याच्या आईवडिलांना, त्याचबरोबर महान फलंदाज व्ही. व्ही. एस. लक्ष्मण व राहुल द्रविड यांच्यासारख्या रत्नपारखींनाही द्यावे लागेल. भारतासारख्या देशात क्रिकेटसारखा खेळ किती ऊजलाय, हे आपण गावखेड्यापासून शहरापर्यंत सर्वत्र पाहत असतो. दिवसेंदिवस क्रिकेटकडे असलेला युवा पिढीचा कल वाढतच असून, स्पर्धाही तितकीच वाढल्याचे दिसून येते. त्यामुळे क्रिकेटकडे करिअर म्हणून पहायचे का आणि पहायचे असेल, तर तेवढी तुमची आर्थिक क्षमता आहे का, याचा विचार आधी पालकांना करावा लागतो. किंबहुना, बेताची आर्थिक स्थिती असतानाही आपल्या मुलाच्या गुणवत्तेवर विश्वास ठेऊन एखादा बाप आपली संपूर्ण जमीन विकण्याची जोखीम पत्करत असेल, तर त्यास सलामच ठोकला पाहिजे. म्हणूनच वैभवच्या यशाचे पहिले श्रेय त्याच्या बाबांना जाते. आयपीएल सुरू झाली 2008 ला. वैभवचा जन्म 2011 चा म्हणजे त्यानंतरचा. त्याच्या भीमपराक्रमाचे मोल लक्षात येते, ते यातूनच. वयाच्या पाचव्या वर्षांपासूनच त्याने क्रिकेटचे धडे गिरवायला सुऊवात केली. पाटण्याच्या क्रिकेट अकादमीत त्याने क्रिकेट घोटवून घेतले. नेट प्रॅक्टिसमध्ये इतर मुले 100 ते 150 बॉल खेळत. वैभव 600 बॉल खेळायचा. यातूनच त्याच्या मेहनतीची कल्पना यावी. 12 व्या वषी बिहारकडून तो विनू मंकड ट्रॉफीत खेळला. 5 सामन्यांमध्ये त्याने ठोकलेल्या 400 धावांमधूनच त्याची चुणूक दिसली. त्याचे प्रथम श्रेणी क्रिकेट आणि रणजी ट्रॉफीतले पदार्पण असेल किंवा रणधीर वर्मा अंडर 19 वन डे स्पर्धेतले त्रिशतक असेल. त्याने वेळोवेळी आपल्या खेळातून क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले. विजय हजारे ट्रॉफी, आशिया कपपासून सगळ्याच स्पर्धा त्याने गाजवल्याचे पहायला मिळते. तेही वयाच्या अवघ्या 12 व्या, 13 व्या वर्षी. अंडर 19 कसोटीत ऑस्ट्रेलियाविरोधात त्याने केवळ 58 चेंडूत ठोकलेले जलद शतक हा त्याच्या क्रिकेटच्या कारकीर्दीचा टर्निंग पॉईंट मानला जातो. याच काळात त्याच्यावर भारताचा व्हेरी व्हेरी स्पेशल क्रिकेटपटू लक्ष्मणची नजर पडल्याचे सांगण्यात येते. लक्ष्मण हा भारताचा स्टायलिश फलंदाज. त्याच्या शैलीबद्दल आजही बोलले, लिहिले जाते. स्वाभाविकच लक्ष्मणच्या मार्गदर्शनाने वैभवला नवी दिशा मिळाली. त्यातूनच अंडर 19 सीरिजसाठीही त्याची निवड झाली. अंडर 19 च्याच एका सामन्यात भारत ब कडून खेळताना वैभव एका सामन्यात 36 धावांवर आऊट झाला आणि डेसिंग रूममध्ये त्याला रडू कोसळले. तेव्हा लक्ष्मणने त्याला रडताना पाहिले व त्याची समजूत घातली, असं म्हणतात. बाद होणे, हा खेळाचा भाग आहे. पण, त्यातून आपल्या चुका सुधारून नव्याने शिकायला हवे आणि दीर्घकाळ टिकणारे कौशल्य आत्मसात करायला हवे, अशी दीक्षा लक्ष्मणने त्याला दिल्याचा किस्सा ऐकवला जातो. म्हटले, तर ही एक साधी घटना. पण, एका मोक्याच्या क्षणी असा गुरू भेटणे आणि जीवनाची वाट दाखवणे, ही मोठी गोष्ट होय. अगदी लक्ष्मणनेच आयपीएल 2025 पूर्वी राहुल द्रविडकडे त्याच्या नावाची शिफारस केली आणि त्यानंतर राजस्थानने त्याला 1 कोटी 10 लाखांना खरेदी केले, यातच सारे आले. म्हणूनच वैभवसारख्या हिऱ्याला पारखणाऱ्या लक्ष्मणचेही कौतुक करायला हवे. राहुल द्रविड हे नाव भारतीय क्रिकेटच्या इतिहासात नेहमीच आदराने घेतले जाते. संघ अंडर 19 चा असो वा मुख्य धारेतला. प्रत्येक खेळाडूशी कसे जुळवून घ्यायचे आणि त्याच्या गुणवत्तेनुसार कामगिरी कशी करून घ्यायची, याचे अजब कौशल्य द्रविड सरांमध्ये आहे. मागच्या काही वर्षांत अगदी खेड्यांपासून शहरांपर्यंतचे क्रिकेटमधील टॅलेंट पुढे आले, ते राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनातून. उदयोन्मुख खेळाडू पुढे आणणे व त्यांना पैलू पाडणे, हा द्रविड यांचा जणू श्वासच बनला आहे. आज कोणताही संघ असो. त्यात बहुतांश विद्यार्थी दिसतात, ते द्रविड सरांचेच. द्रविड यांच्याच परिसस्पर्शाने वैभवचा खेळ अधिक खुलला, असे म्हणता येईल. अवघ्या 14 व्या वर्षी म्हणजे शाळेच्या वयात शतक ठोकल्याने वैभवची तुलना आपसूक सचिन तेंडुलकरशीही केली जात आहे. शाळकरी वयात क्रिकेटमध्ये एन्ट्री करून सचिनने घडवलेला इतिहास समोर आहे. मात्र, अपेक्षांचे असे ओझे टाकणे योग्य नाही. वैभवला अजून बराचा पल्ला गाठायचा आहे. आणखी कसून क्रिकेट खेळायचे आहे, अनुभव मिळवायचा आहे. एक मोठा क्रिकेटर होण्याकरिता आवश्यक असलेले गुण त्याच्यात निश्चितच आहेत. पण, त्याकरिता भविष्यातही त्याने सातत्य, मेहनत व संयम दाखवाला पाहिजे. त्याचबरोबर सदैव जमिनीवर राहून क्रिकेटशी कायम एकनिष्ठ राहण्याची काळजी त्याला घ्यावी लागेल. क्रिकेटमध्ये क्लास इज परमनंट, अशा अर्थाची म्हण आहे. हा मंत्र जपतच वैभवला पुढचे पाऊल टाकावे लागेल.