For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लक्षद्वीपमध्ये नौदलाचा नवीन तळ

06:45 AM Mar 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
लक्षद्वीपमध्ये नौदलाचा नवीन तळ
Advertisement

‘आयएनएस-जटायू’वरून पाकिस्तान-चीन-मालदीववर कडक नजर, चाचेगिरीवर कारवाई करण्यासाठीही सज्ज

Advertisement

वृत्तसंस्था/ मिनिकॉय (लक्षद्वीप)

भारतीय नौदलाने लक्षद्वीपच्या मिनिकॉय बेटावरील आपला नवीन नौदल तळ ‘आयएनएस जटायू’ नौदलात सामील केला. यावेळी नौदल प्रमुख अॅडमिरल आर. हरिकुमार उपस्थित होते. या नौदल तळावरून पाकिस्तान, मालदीव आणि चीनच्या हालचालींवर तीक्ष्णपणे लक्ष ठेवता येईल. याशिवाय या तळावरून समुद्री चाच्यांवरही लवकर नियंत्रण मिळवता येणार असल्याचा दावा करण्यात आला.

Advertisement

भारतीय नौदलाने बुधवारी मिनिकॉय बेटावर ‘आयएनएस जटायू’ नावाचा नवीन तळ कार्यन्वित केल्यामुळे सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या लक्षद्वीप बेटांमध्ये नौदलाची परिचालन क्षमता वाढेल. या तळामुळे नौदलाची ताकद वाढली असून भारतीय सागरी क्षेत्रात चीनच्या कारवायांनाही आळा बसणार आहे. मिनिकॉय येथील ‘आयएनएस जटायू’ नौदल तळापासून मालदीवचे अंतर केवळ 524 किमी आहे. मिनिकॉय हे लक्षद्वीपचे सर्वात दक्षिणेकडील बेट असून ते दळणवळणाच्या महत्त्वाच्या सागरी क्षेत्रात पसरलेले आहे. आयएनएस जटायू हे कावरत्ती येथील आयएनएस द्विपरक्षक नंतर लक्षद्वीपमधील दुसरा नौदल तळ आहे.

भारतीय नौदलाने सागरी सुरक्षा अधिक मजबूत करण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत. आगती बेटावरील हवाई पट्टी देखील अपग्रेड केली जात आहे. तसेच ‘आयएनएस जटायू’ लक्षद्वीपमध्ये तैनात करण्यात आली आहे. या तैनातीमुळे सुरक्षा अधिक मजबूत होणार असून या तळाच्या मदतीने नौदलाला पश्चिम अरबी समुद्रात प्रभावी पाळत ठेवणे शक्मय होणार आहे. ‘आयएनएस जटायू’ चाचेगिरी आणि अमली पदार्थविरोधी कारवाया थांबवण्यातही खूप प्रभावी ठरेल. नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार यांच्या उपस्थितीत येथे आयोजित एका कार्यक्रमात ‘आयएनएस जटायू’ हा नवीन तळ सुरू करण्यात आला. दक्षिण नौदल कमांडचे प्रमुख व्हाईस अॅडमिरल व्ही श्रीनिवास आणि वेस्टर्न नेव्हल कमांडचे प्रमुख व्हाईस अॅडमिरल संजय जे सिंग यांनीही या कार्यक्रमात भाग घेतला.

‘आयएनएस जटायू’ कार्यन्वित केल्यानंतर मिनिकॉय येथे झालेल्या कार्यक्रमात संबोधित करताना कुमार म्हणाले की, सीतेचे अपहरण थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या महाकाव्य रामायणातील पौराणिक प्राण्याच्या नावावरून ‘आयएनएस जटायू’ हे नाव देण्यात आले. रामायणात, जटायू हा ‘प्रथम प्रतिसादकर्ता’ असल्यामुळे या युनिटचे जटायू असे नामकरण ही त्याची योग्य ओळख आहे. सुरक्षा पाळत ठेवणे आणि नि:स्वार्थ सेवा देण्याची भावना या तळाच्या माध्यमातून पूर्ण होणार असल्याचे कुमार यांनी सांगितले. आता अंदमानात पूर्वेला ‘आयएनएस बाज’ आणि पश्चिमेला ‘आयएनएस जटायू’ डोळे आणि कान म्हणून काम करेल. राष्ट्रीय हित जपण्यासाठी नौदल सज्ज असल्याचेही त्यांनी पुढे स्पष्ट केले.

Advertisement
Tags :

.