स्वच्छ भारत मिशन योजनेकडे ग्राम. पं.चे दुर्लक्ष
सरकारकडून कोट्यावधीचा निधी खर्च : कचरावाहू वाहने पडून : ग्रामपंचायतीचे उदासीन धोरण
बेळगाव : स्वच्छ भारत मिशन योजनेंतर्गत ग्राम पंचायत व्याप्तीमध्ये निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महत्त्वाकांक्षी योजना जारी करण्यात आली आहे. मात्र योजनेच्या समर्पक अंमलबजावणी होत नसल्याने सरकारकडून करण्यात येणारा लाखो रुपयांचा खर्च वाया जात आहे. गावागावात कचरा संकलनासाठी देण्यात आलेली वाहने अडगळीत पडून आहेत. यामुळे सरकारचा कोट्यावधींचा निधी वाया जात असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त केली जात आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा पंचायतीच्या विकास आढावा बैठकीमध्ये ग्राम पंचायत व्याप्तीतील स्वच्छतेवर भर देण्याची सूचना करण्यात आली आहे. ग्राम पंचायतीच्या व्याप्तीत निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करून भविष्यातील कचऱ्याची समस्या निवारण करण्यासाठी आतापासूनच उपाय योजना राबविल्या जात आहेत. मात्र ग्राम पंचायतींच्या उदासिन धोरणामुळे कचरा निर्मूलनाचे नियोजन कुचकामी ठरत आहे. ग्राम पंचायतींच्या व्याप्तीत संग्रहीत होणाऱ्या कचऱ्याचे वर्गीकरण करुन सदर कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची योजना आखण्यात आली आहे.
कचऱ्याची वाहतूक करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक ग्राम पंचायतीला कचरावाहू वाहन उपलब्ध करुन देण्यात आले आहे. यासाठी महिला वाहन चालकांना प्राधान्य देण्याचे नियोजनही करण्यात आले होते. महिलांना वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. मात्र बहुतांश ग्राम पंचायतींमध्ये कचरावाहू वाहने पडून आहेत. शासनाकडून कोट्यावधी रुपयांचा खर्च करुन वाहने उपलब्ध करुन देण्यात आली असली तरी कचरा संकलनाकडे ग्राम पंचायतींकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. बहुतांश गावांच्या प्रवेशद्वारातच कचऱ्याचे ढीग साचल्याचे चित्र दिसून येते. कचरा निर्मूलनासाठी सरकारची योजना असतानाही ग्राम पंचायतींच्या उदासीन धोरणामुळे योजना कागदावरच राहात आहेत. कचरा निर्मुलनासाठी उभारण्यात आलेले घटक पुन्हा सुरू करण्याची सूचना जिल्हा पंचायत अधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. याचे ग्राम पंचायत विकास अधिकारी, सचिव, ग्राम पंचायत सदस्य किती गांभीर्याने दखल घेतात हे पहावे लागणार आहे.