प्रशासनाचे दुर्लक्ष...कार्यकर्त्यांनी दिले लक्ष
रस्त्यावरील गतिरोधकावर ओढले पांढरे पट्टे
बेळगाव : बेळगावमध्ये नागरी समस्यांची सोडवणूक करण्यासाठी नागरिक सातत्याने प्रशासनाकडे निवेदने देऊन मागणी करत असतात. मात्र त्यांचे निराकरण होतेच असे नाही. सध्या तरी निवडणुकीचे कामकाज असे उत्तर देऊन सरकारी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना नंतर या, असे सांगण्यात येते. मात्र या परिस्थितीमध्ये काळ मात्र सोकावतो व अनेकांना नाहक जीव गमवावा लागतो. शहरात अत्यंत वर्दळीच्या अशा काँग्रेस रोडवरील गतिरोधकावर पांढरे पट्टे ओढावेत, ही अनेकांची मागणी फार दिवसांपासून आहे. मात्र अद्याप महानगरपालिका आणि प्रशासनाने इतकी साधी मागणी सुद्धा पूर्ण केली नाही. परिणामी या गतिरोधकाचा अंदाज न आल्याने या ठिकाणी सातत्याने अपघात होत आहेत. या गतिरोधकाने काही जणांचा बळी घेतला आहे. प्रशासनाच्या या उदासीन भूमिकेला वैतागुण सामाजिक कार्यकर्त्यांनी मंगळवारी स्वत:च रंग आणून ब्रश हातात घेऊन गतिरोधकावर पांढरे पट्टे ओढले. सामाजिक कार्यकर्ते व आपत्कालीन परिस्थितीत लोकांच्या मदतीला धावून जाणारे एचईआरएफ टीमचे प्रमुख बसवराज हिरेमठ, पद्मप्रसाद हुली तसेच संतोष दरेकर, दिनेश कोल्हापुरे, अमरनाथ गवाणे व राहुल पाटील यांनी गतिरोधकावर पट्टे ओढून नागरिकांची सोय केली.