For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नरेंद्र मोदी फक्त मुखवटा! भारत जोडो यात्रेच्या समारोपात राहुल गांधींचा हल्लाबोल

06:58 AM Mar 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
नरेंद्र मोदी फक्त मुखवटा  भारत जोडो यात्रेच्या समारोपात राहुल गांधींचा हल्लाबोल
Advertisement

Advertisement

मुंबई/ प्रतिनिधी

नरेंद्र मोदी फक्त मुखवटा असून त्यांच्याकडून एक शक्ती विविध प्रकारची काम करून घेत आहे. मणिपूरमध्ये हीच शक्ती सिव्हिल वॉर करत आहे. तसेच ‘राजा की आत्मा इव्हीएम मे हैं’ असें सूचक विधान करत सगळ्या लहान उद्योगांना मोदी सरकार संपवून टाकत त्यांना हव्या असलेल्या कंपन्यांनाच देशात थारा देण्याचे काम सुरु असल्याचे सांगत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जाहीर सभेत जहरी टीका केली. मणिपूरहून निघालेल्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’चा रविवारी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरील जाहीर सभेने समारोप झाला. यावेळी देशभरातील शरद पवार, उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर, तेजस्वी यादव यांच्यासह आघाडीमधील प्रमुख नेत्यांचा सहभागी होते. त्यांच्या या उपस्थितीने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

Advertisement

दरम्यान पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले की, मागच्या वर्षी कन्याकुमारी ते काश्मीर अशी यात्रा करावी लागली. मात्र 2004 ते 2014 या वर्षात 4 हजार कि. मी.  मला चालवे लागेल असे वाटलेही नव्हते. मात्र देशातील संवाद तुटल्याचे पाहिल्यावर मला संवाद यात्रा करावी लागली. आज सर्व माध्यम देशाच्या हातात नाही. देशातील प्रश्न बेरोजगारी, हिंसा, शेतकरी यांचे प्रश्न माध्यमातून ऐकायला मिळत नाहीत म्हणून यात्रा करावी लागली. या यात्रेत सर्व विरोधी पक्ष एकवटला होता. मात्र सोशल मीडियावरही नियंत्रण ठेवण्यात आले असून ही लढाई भाजपशी असल्याचे चित्र निर्माण करण्यात आले आहे. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षा विरोधात किंवा मोदी तसेच एखाद्या व्यक्तीविरोधात लढत नसून आम्ही शक्तीच्या विरोधात लढत असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले.

राजाचा आत्मा ईव्हीएम, ईडी, आयटी संस्थेत अडकून

तसेच राजाचा आत्मा ईव्हीएम, ईडी, आयटी संस्थेत अडकला असून काँग्रेस मधील एका ज्येष्ठ नेत्याने त्याला जेलमध्ये जाण्याची इच्छा नसल्याने भाजपात गेल्याचे सांगितले. असे अनुभव सांगत सर्व पक्षातील राजकीय नेते घाबरून त्या पक्षात जात असल्याचे गांधी म्हणाले. तर नरेंद्र मोदी फक्त मुखवटा आहे. त्यांच्याकडून ती शक्ती विविध काम करून घेत आहे. मणिपूरमध्ये हिच शक्ती सिव्हिल वॉर करत आहे. त्यामुळे मणिपूरमधून यात्रेला सुरुवात करून मुंबईत त्याची सांगता केली.

fिनम्न वर्गातील उमेदवार अधिकारी वर्गात नसल्याचे सांगत श्रीमंत लोकच पॉलिसी तयार करत असल्याचे ते म्हणाले. तर ईव्हीएम शिवाय मोदी निवडणूक जिंकू शकत नाही. आणि इव्हीएममधील कागदाची मोजणी करण्यास शासकीय सिस्टम तयार नसळ्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. सिस्टम चोरी करणाऱ्यांना मदत करते. कोणत्याही योजना पाहाल तर त्यात गरीब कोणीच नाही. नरेंद्र मोदी दिशाभूल करण्याचे काम करत आहेत. देशात नेमक्याच कंपन्यांचे राज्य निर्माण करण्याचे त्यांचे उद्दिष्ट असून त्यांना तळागाळातील छोट्या उद्योगना उखडून टाकायचे आहे. द्वेष पसरवला जात असून त्याआडून जनतेला लुटले जात आहे. द्वेष सोडून मोहब्बतचे दुकान खोलो, असे राहुल गांधी यांनी म्हणाले.

खोट्या आश्वासन देणाऱ्यांना सत्तेपासून दूर करा : शरद पवार

हिंदुस्थानची स्थिती वाईट असून देशाला वेगवेगळ्या लोकांनी आश्वासन देऊन फसवले. ज्या लोकांच्या हाती सत्ता आहे त्यांनी अनेक घटकांना फसवले आहे. यात महिला, शेतकरी कष्टकरी सर्व घटक आहेत. या खोट्या आश्वासन विरोधात आपल्याला उभा राहायचे आहे, असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सभेला संबोधित करताना म्हटले आहे.  यांना सत्तेपासून दूर करायचे आहे. दबावतंत्राविरोधात उभा राहायचे आहे. देशाची आज जी अवस्था आहे, त्यात बदल करण्याची गरज आहे.

मोदींची गॅरंटी चालणारी नाही

मोदींची गॅरंटी चालणारी नाही. खोटं आश्वासन देऊ त्यांनी आपल्याला वेगळ्या रस्त्यावर नेण्याचा प्रयत्न केला. आजपासून टीव्हीवर ही गॅरंटी दिसणार नाही. कारण निवडणूक आयोगाने ती रोखण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल आम्ही निवडणूक आयोगाचे आभार मानत आहोत. 42 मध्ये महात्मा गांधी यांनी छोडो भारत, छोडो हुकूमतचा नारा दिला होता. आता याच शहरात छोडो भाजप आणि भाजपसे मुक्ती असा नारा देत निर्धार केला पाहिजे, असं शरद पवार यांनी म्हटलं.

भाजपा ही एक हवा आहे : उद्धव ठाकरे

भारत जोडो यात्रेची सांगता राहुल गांधी यांनी शिवाजी पार्कात केली. त्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी आभार मानले. ठाकरे यांनी यावेळी ठाकरे शैली दाखवत भाजपावर जोरदार टीका केली. ठाकरे म्हणाले की भाजपा ही हवा आहे. ही हवा फुगवण्याचे काम त्यावेळी आम्हीच केली. त्याच वैषम्य वाटत असल्याची कबुली ठाकरे यांनी यावेळी दिली. भाजपा 400 सीट येतील असें सांगतात. म्हणजे घराणेशाहीत तुम्ही आणि तुमची खुर्ची एवढच असून यात ते बोलत असल्याचे परिवार नाही असें ठाकरे म्हणाले. दरम्यान ही लढाई लोकशाही वाचविण्याची तसेंच संविधान वाचविण्याची आहे. त्यामुळे बाळा साहेब ठाकरे कोर्टात नेहमी संविधान ठेवा असें सांगत. रशियातील निवडणुकीत फक्त पुतीन असून इथे ही तसं घडू नये.

म्हणून देश वाचवला पाहिजे

देश हाच माझा धर्म आणि देश वाचला तर आम्ही वाचू असें ठाकरे म्हणाले. आपली ओळख देश असावी देशाची ओळख व्यक्ती असू नये. कोणी किती मोठा असला तरी त्यापेक्षा देश असतो. देशाचं नाव बदलण्याची इच्छा आहे का त्यांची? युतीच्या सरकार असताना अटल बिहारीं यांनी चांगला देश चालवला होता. इंडिया शायनिंग वातावरण होते. तसेच नरसिंह राव व मनमोहन यांनी देखील सरकार चांगल चालवलं. मात्र आता जे सरकार 2014 पासून आलंय ते 2047 पर्यंत ची गोष्ट करत आहेत. सत्तेचा कोणीही अमरपट्टा घेऊन येत नाही.  हुकूमशाह किती ही मोठा असला तरी सगळे एकवटल्यावर हुकूमशाहाचा अंत होतो. आज ही तशी वेळ आली आहे.

सोबत लढू किंवा एकटे लढू पण लढलं पाहिजे : प्रकाश आंबेडकर

आपल्याला लढलं पाहिजे. सोबत लढू किंवा एकटे लढू पण लढलं पाहिजे. मी देशभरातील परिस्थिती सांगत आहे. कारण बंगालमध्ये वेगळी परिस्थिती आहे. महाराष्ट्रात एकत्र लढण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण दोन गोष्टी आहेत. त्या मोठी आहेत, हे मला वाटतं. इलेक्ट्रॉल बाँड आलं आहे. प्रत्येक चॅनलवर अमित शाह यांची प्रतिक्रिया आली आहे. आम्ही काळापैसा पळवून लावला आहे, असं अमित शाह म्हणत आहे. मोदींना तुम्ही इलेक्ट्रॉल बाँडवरून सवाल विचारणार की नाही. अमित शाह यांनी त्या कंपनीकडे 1300 कोटी रुपये आले कुठून याचं उत्तर द्या. त्या कंपनीची ईडी चौकशी केली पाहिजे. प्रियंका गांधी यांची विनंती आहे, मोदी म्हणतात देश आपलं कुटुंब आहे. देश त्यांचं कुटुंब आहे. पण त्यांच्या ख्रया कुटुंबातील एक महिला त्यांच्यासोबत राहत नाही, मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाही, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

महाराष्ट्र सरकारमध्ये नेते नाहीत, फक्त डिलर आहेत :तेजस्वी यादव

या सभेत बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी महाराष्ट्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. “महाराष्ट्र सरकारमध्ये नेते नाहीत, फक्त डिलर आहेत“, असा घणाघात तेजस्वी यादव यांनी केला.

आघाडीचे सरकार आल्यानंतर ईव्हीएम मशिन हटवले जातील : फारुख अब्दुल्ला

ईव्हीएम मशिन चोर आहे. याविरोधात आम्ही वेळोवेळी आंदोलन केले आहे. मात्र भाजप सरकार ते हटवायला तयार नाही. या देशाचा निवडणूक आयोग आता स्वतंत्र राहिलेला नाही. देशात इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर पहिलं काम हे ईव्हीएम मशिन हटवण्याचे केले जाईल, असा विश्वास जम्मू काश्मिरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी व्यक्त केला.

शिवसैनिकांसाठी हा काळा दिवस - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आज ज्या शिवतीर्थावर बाळासाहेब यांचे ं  विचार ऐकण्यासाठी शिवसैनिक यायचे त्याच ठिकाणी काँग्रेसची सभा होत आहे. त्या ठिकाणी काही लोकं भाषण करतील, हा शिवसैनिकांसाठी काळा दिवस आहे. ज्या राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केला. त्यांच्या मांडीला मांडी लावून काही जणं बसलेत. त्या सर्वांनी आधी राहुल गांधींना सावकरांच्या स्मारकाजवळ नतमस्तक करायला हवं होतं, अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

Advertisement
Tags :

.