भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी न. पं. कडून आस्थापनांना नोटिसा
काही दिवसात शहरातील भटक्या कुत्र्यांचा उपद्रव कमी होणार
खानापूर : खानापूर शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार खानापूर नगरपंचायतीने शहरातील भटक्या कुत्र्यांच्याबाबत ठोस क्रम घेतला आहे. शहरातील सर्व महत्त्वाच्या सार्वजनिक व खासगी संस्थांना आपल्या आवारातील भटक्या कुत्र्यांसंदर्भात माहिती देण्यात यावी, अशी नोटीस देण्यात आली आहे. यात शैक्षणिक संस्था, सरकारी-खासगी रुग्णालये, क्रीडा संकुले तसेच बसस्थानक आणि रेल्वेस्थानक प्रशासन यांना नोटिसी देण्यात आल्या आहेत.
यामुळे येत्या काही दिवसात शहरातील भटक्या कुत्र्यांचा उपद्रव कमी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भटक्या कुत्र्यांच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने सु-मोटू रिट याचिका क्रमांक 5/2025 मध्ये स्पष्ट निर्देश दिले असून, त्याची अमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. शहरातील भटक्या कुत्र्यांच्याबाबत आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी क्रम घ्यावा, असे सर्वोच्च न्यायालयाने सूचित केले आहे. तशा आशयाचे आदेश खानापूर नगरपंचायतीला देण्यात आले आहेत.
परिसरातील सर्व भटक्या कुत्र्यांची तातडीने माहिती द्या
या पार्श्वभूमीवर खानापूर नगरपंचायतीने शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचा निर्णय घेतला असून, शहरातील सर्व आस्थापनांना आपल्या परिसरात असलेल्या सर्व भटक्या कुत्र्यांची तातडीने माहिती देण्यात यावी, अशी नोटीस बजावण्यात आली आहे. येत्या काही दिवसात शहरातील भटक्या व बेवारस कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात येणार असून, त्यानंतर शहरातील आस्थापनांच्या परिसरात भटकी कुत्री असल्यास त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी न्यायालयाच्या निर्देशानुसार कर आकारण्यात येणार असल्याचे नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.