शेतकऱ्यांच्या विकासात नाबार्डचा मोठा वाटा!
नाबार्डमुळे शेतकऱ्यांचा विकास! मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन
पणजी : किसान क्रेडीट कार्ड हा शेतकऱ्यांचा हक्क, अधिकार असून त्यांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. काल मंगळवारी पणजीतील नाबार्डतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पतपुरवठा चर्चासत्राचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. प्रमुख पाहुणे या नात्याने त्यांनी चर्चासत्राचे उद्घाटन केले. नाबार्ड गोवा शाखेने तयार केलेल्या राज्यस्तरीय 2024-25 योजनांचे (फोकस पेपर) अनावरण डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते करण्यात आले. गोव्यातील ग्रामीण भागात मुलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी नाबार्डने मोठे सहकार्य आणि योगदान दिले आहे. राज्यात भात उत्पादन वाढले असून त्यावर प्रक्रिया कऊन तांदळाची निर्यात करणे आवश्यक आहे. शेती आणि कृषी क्षेत्रात विविध उपक्रमांनी कुशलता वाढवण्यामागे नाबार्डचा मोठा वाटा असल्याचे डॉ. सावंत यांनी नमूद केले. नाबार्डने शेतकरीवर्गासाठी मोठा आर्थिक आधार दिला असून त्यामुळेच शेतीचा, शेतकऱ्यांचा विकास झाल्याचे डॉ. सावंत म्हणाले. वित्त खात्याचे प्रधान सचिव डॉ. व्ही. कांदावेलू यांनी नाबार्डने दिलेल्या कर्ज सोयी-सुविधांचा उल्लेख केला आणि राज्यातील महिला बचत गटांना त्याचा लाभ मिळवून दिला म्हणून नाबार्डचे कौतुक केले. नाबार्डच्या गोवा कार्यालयाचे महाव्यवस्थापक मिलिंद भिऊड यांनी प्रास्ताविक आणि उपस्थितांचे स्वागत केले. तसेच शेवटी आभार मानले. या कार्यक्रमात विश्वभंर गावस, उदय प्रभुदेसाई, सुदेश मयेकर, प्रेमानंद महांबरे, आत्माराम शेटये यांचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला.