मुस्लिमांनो, विरोधकांचा नाद सोडा !
या देशात हिंदू आणि मुस्लीम यांच्यात भांडणे लावण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. मुस्लिमांनी विरोधकांच्या जाळ्यात अडकू नये. त्यांनी देशाच्या विकासातील त्यांची भूमिका साकारावी आणि विरोधकांच्या स्वार्थी राजकारणाच्या पटावरचे प्यादे बनणे टाळावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यांनी एका मुलाखतीत हे आवाहन मंगळवारी तिसऱ्या टप्प्याचे मतदान होत असताना केले.
मुस्लिमांच्या धर्मभावनांचे विरोधकांकडून शोषण केले जात आहे. मी प्रथमच संपूर्ण मुस्लीम समाजाला आणि त्यांच्यातील सुशिक्षित वर्गाला असे आवाहन करीत आहे. मुस्लिमांनी आत्मपरिक्षण करण्याची आवश्यकता आहे. आज भारत देश वेगाने प्रगतीपथावर अग्रेसर होत असताना मुस्लीमांना भांबावल्यासारखे का वाटत आहे, याचा त्यांनी शांतपणे विचार केला पाहिजे. भारतीय जनता पक्षाने आपल्या 10 वर्षांच्या सत्ताकाळात कोणताही धार्मिक भेदभाव न करता सरकारी योजनांचा लाभ साऱ्यांना मिळू दिला. काँग्रेसच्या सत्ताकाळात असा लाभ का मिळत नव्हता, याचा विचार या समाजाने करावा. तरच हा समाज देशाच्या मुख्य प्रवाहात येऊ शकतो. हे या समाजाने ध्यानात घेण्याची ही वेळ आहे. मुस्लीमांनी त्यांच्या अपत्यांचा आणि पुढच्या पिढीचा विचार केला पाहिजे. तसेच एक समाज म्हणून स्वत:च्या भवितव्याविषयीही जागरुकता दाखविली पाहिजे. कोणीतरी भीतीचे वातावरण निर्माण करीत आहे म्हणून एका समाजाने सातत्याने आपले शोषण होऊ द्यावे, असे मला वाटत नाही, असे प्रतिपादन त्यांनी मुलाखतीत केले आहे.
प्रचार सभेतही आवाहन
उत्तर प्रदेशातील धौराऱ्हा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार रेखा वर्मा यांच्या प्रचार सभेत भाषण करतानाही त्यांनी मुस्लीमांना असे आवाहन केले आहे. गरीब, दलित, वनवासी आणि अन्य मागासवर्गियांसाठी आमच्या सरकारने गेली 10 वर्षे अनेक योजनांवर काम केले आहे. या योजनांचा लाभ मुस्लीमांनाही कोणताही भेदभाव न करता देण्यात आला आहे. गरीबांसाठी घर योजना, नळपाणी योजना, उज्ज्वला योजना आदी योजनांचा लाभ मुस्लीमांनाही मिळाला आहे. याची त्यांना आठवण आहे, अशा शब्दांमध्ये त्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.