For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विद्यानगर रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य

10:50 AM Aug 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
विद्यानगर रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य
Advertisement

खानापूर नगरपंचायतीने साफ दुर्लक्ष केल्याने नागरिकांतून तीव्र संताप

Advertisement

खानापूर : येथील विद्यानगरातील रस्त्यावर गेल्या महिन्याभरापासून चिखलाचे साम्राज्य पसरले असून या रस्त्यावरुन चालत जाणेही धोकादायक बनलेआहे. मात्र याकडे नगरपंचायतीने साफ दुर्लक्ष केल्याने या भागातील नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. वारंवार मागणी करुनदेखील या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत नगरपंचायतीने काहीही क्रम घेतलेला नसल्याने नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. शहराचे मोठे उपनगर म्हणून प्रसिद्ध असलेले विद्यानगर येथील उपनगरातील रस्त्यावर चिखल झाला असून रस्त्यावर पूर्णपणे चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्यावरुन या भागातील रहिवाशांना चालत जाणेही धोकादायक बनले आहे.अनेकवेळा या चिखलातून चालत जाताना पाय घसरुन पडण्याच्या घटनाही घडल्या आहेत.

दुचाकीवरुन जातानादेखील अनेकवेळा दुचाकी चिखलात अडकून तसेच घसरण्याचे प्रकार घडत आहेत. या उपनगरातील काही भागात गटारी नसल्याने पाणी रस्त्यावर येत असून चिखलामुळे दुर्गंधीही पसरली आहे. जागोजागी खड्डे पडल्याने पावसाचे तसेच गटारीचे पाणी रस्त्यावरील खड्ड्यात साचत असल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. या रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला रामगुरवाडी ग्राम पंचायतीची हद्द असून त्या भागात पंचायतीने गटारीचे नियोजन केले आहे. तसेच ग्रा. पं. हद्दीतील घरांचे पन्हाळीचे पाणीही खानापूर नगरपंचायतीच्या रस्त्यावर पडत असल्याने मोठ्या प्रमाणात चिखल होत आहे. अर्जविनंत्या करूनही नगरपंचायतीने साफ दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तरी त्वरित रस्त्यावरील चिखल हटवून काँक्रीटीकरण करावे आणि गटारी बांधाव्यात, अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.