अंतराळापूर्वी मोदींनी मणिपूरचा दौरा करावा
काँग्रेस नेते जयराम रमेश यांची उपरोधिक टिप्पणी
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अंतराळप्रवास करणार असल्याची चर्चा सुरू असताना काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी उपरोधिक टिप्पणी केली आहे. नॉन बायोलॉजिकल पंतप्रधानांनी अंतराळापूर्वी मणिपूरला जावे असे जयराम रमेश यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे म्हटले आहे. 1 ऑगस्ट 2023 रोजी सर्वोच्च न्यायालयाने मणिपूरमध्ये घटनात्मक व्यवस्था संपुष्टात आल्याचे म्हटले होते. तर न्यायालयाने बुधवारी पुन्हा राज्य सरकारवर भरवसा ठेवता येत नसल्याचे नमूद केले. तरीही नॉन-बायोलॉजिकल पंतप्रधान केवळ तोंडाची वाफ दवडण्याशिवाय काहीच करत नसल्याची टीका जयराम रमेश यांनी केली आहे.
मोदींनी अंतराळ मोहिमेत सामील होण्याचा निर्णय घेतला तर तुम्हाला आनंद होईल का अशी विचारणा इस्रो प्रमुख एस. सोमनाथ यांना एका मुलाखतीत करण्यात आली होती. भारतीय यानानेच पंतप्रधानांनी अंतराळ मोहीम करावी. याकरता गगनयान पूर्णपणे तयार होणे आवश्यक आहे. गगनयान मोहीमेसाठी सध्या कुठल्याही व्हीआयपी किंवा अन्य उमेदवाराच्या नावावर विचार केला जाऊ शकत नाही. कारण या मोहिमेत अधिक कौशल्य आणि प्रशिक्षणाची गरज असते, ज्याकरता कित्येक वर्षे आणि महिने लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.
गगनयान ही भारताची पहिली मानवयुक्त अंतराळ मोहीम आहे. ही मोहीम पुढील वर्षी साकार होणार आहे. या मोहिमेचा उद्देश भारतीय अंतराळवीरांना पहिल्यांदाच देशात निर्मित अंतराळयानाद्वारे पृथ्वीच्या कनिष्ठ कक्षेत पाठविणे आहे. ही मोहीम यशस्वी ठरली तर अंतराळात मानवी मोहीम राबविणारा भारत हा चौथा देश ठरणार आहे. गगनयान मोहीम तीन दिवसांची असणार आहे.
नॉन-बायोलॉजिकल उल्लेख का?
मोदींनी लोकसभा निवडणुकीदरम्यान एका मुलाखतीत जोपर्यंत माझी आई जिवंत होती, तोपर्यंत मी बायोलॉजिकल स्वरुपात जन्मलो असे वाटायचे, परंतु तिच्या निधनानंतर देवानेच एखाद्या खास उद्देशासाठी भूतलावर पाठविले असल्याचा विश्वास पक्का झाल्याचे म्हटले होते. मोदींच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांनी उपरोधिक टीका केली होती.