वीर बाल दिन सोहळ्यात मोदींनी घेतला भाग
स्वत:च्या वारशाबद्दल गर्व केल्यास जग वेगळ्या दृष्टीकोनातून पाहते : भारतीयांना प्रेरणा देणारा दिवस
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
गुरु गोविंद सिंह यांच्या पुत्रांच्या हौतात्म्याच्या स्मृतिप्रित्यर्थ मंगळवारी देशभरात वीर बाल दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त दिल्लीच्या भारत मंडपमध्ये आयोजित झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाग घेतला आहे. स्वातंत्र्याच्या अमृतकाळात ‘वीर बाल दिन’ म्हणून एक नवा अध्याय सुरू झाला आहे. गुरु गोविंद सिंह आणि त्यांच्या चारही मुलांचे शौर्य प्रत्येक भारतीयाला शक्ती देते. हा दिवस त्या वीरांच्या शौर्याला खरी श्रद्धांजली असल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत.
आम्ही मागील वर्षापासून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली होती. यंदा अनेक देशांमध्ये हा कार्यक्रम साजरा करण्यात आला आहे. जेव्हा आम्ही आमच्या वारशावर गर्व करण्यास सुरु करतो तेव्हा जग आम्हाला वेगळ्या दृष्टीकोनातून पाहू लागत असल्याचे मोदींनी म्हटले आहे.
भारत असा देश आहे जेथे चंद्रगुप्त मौर्य सारखा एक तरुण महान साम्राज्य निर्माण करू शकतो. भारत असा देश आहे, जेथे बालक ध्रूव कठोर तपस्या करतो. भारत असा देश आहे जेथे खुदीराम बोस, बटुकेश्वर दत्त, राणी गाइडिल्यू यासारख्या क्रांतिकारकांनी स्वत:च्या शौर्याद्वारे आदर्श प्रस्थापित केल्याचे मोदी म्हणाले.
भारताला तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था करण्याबद्दल बोलत असताना माझ्या मनात युवांचा विचार असतो. 2047 चा भारत कसा असेल याचे चित्र हेच युवा ठरविणार आहेत. सर्वांना उत्तम आरोग्य सुविधा मिळाव्यात, रोजगार, संधी मिळाव्यात या दिशेने आमचे सरकार काम करत असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.
अन्य देशांकडून अनुकरण
यंदा अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, युएई आणि ग्रीस या देशांमध्येही वीर बाल दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आज भारताला स्वत:च्या लोकांवर, त्यांच्या क्षमतांवर पूर्ण भरवसा आहे. सर्वाधिक युवा लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे. स्वातंत्र्यलढ्यावेळी देखील युवांची इतकी संख्या नव्हती. त्यावेळच्या युवाशक्तीने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले होते, तर आजची युवाशक्ती भारताला कुठल्या उंचीवर पोहोचवू शकते याची कल्पनाही करता येणार नाही. आगामी 25 वर्षे आमच्या युवाशक्तीसाठी अमाप संधी उपलब्ध करणारी ठरतील असा दावा मोदींनी केला आहे. भारताच्या कुठल्याही क्षेत्रात, समाजात जन्मलेल्या युवांची आता मोठी स्वप्ने आहेत. ही स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सरकारकडे स्पष्ट रोडमॅप आहे, स्पष्ट व्हिजन अन् धोरण असल्याचे मोदींनी म्हटले आहे.
अमित शाह यांचाही सहभाग
गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जगतप्रकाश न•ा यांनी पश्चिम बंगालमध्ये वीर बाल दिन साजरा केला आहे. वीर बाल दिनी गुरु गोविंद सिंह यांचे चार पुत्र आणि माता गुजरी यांना नमन करतो. सर्वोच्च साहसाच्या बळाद्वारे ते अत्यंत क्रूर मुघलांच्या विरोधात उभे ठाकले. त्यांनी धर्मांतराऐवजी हौतात्म्य पत्करले. त्यांचे शौर्य आगामी अनेक पिढ्यांना प्रेरित करत राहणार असल्याचे शाह यांनी नमूद केले आहे.
अमेरिकेतही दिन साजरा
अमेरिकेच्या वॉशिंग्टनमध्ये वीर बाल दिन साजरा करण्यात आला आहे. शीख समुदायाच्या लोकांनी हा दिन साजरा करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत. हा दिन साजरा करण्यात आल्याने लोकांना शिखांच्या इतिहासाबद्दल जाणून घेण्याची संधी मिळाली असल्याचे इंडियन मायनॉरिटीज फौंडेशनचे संयोजक सतनाम सिंह संधू यांनी म्हटले आहे.