अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत अत्याधुनिकीकरण
नैर्त्रुत्य रेल्वेच्या बेळगावसह 50 रेल्वेस्थानकांचा समावेश
बेळगाव : भविष्यातील रेल्वे प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन रेल्वे विभागाकडून विमानतळांच्या धर्तीवर विकास केला जाणार आहे. अत्याधुनिक सेवा-सुविधा रेल्वेस्थानकांवर देण्यासाठी अमृत भारत स्टेशन योजना राबविली जाणार आहे. बेळगावसह नैर्त्रुत्य रेल्वेच्या 50 रेल्वेस्थानकांवर या योजनेतून विकास करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. रेल्वेस्थानकांचा विकास करण्यासाठी अमृत भारत स्टेशन योजना राबविली जाणार आहे. देशभरातील महत्त्वाच्या रेल्वेस्थानकांवर अत्याधुनिक सेवा-सुविधा देण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरणार आहे. बेळगाव रेल्वेस्थानकाचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. बेळगाव रेल्वेस्थानकाचे दीड वर्षापूर्वीच नूतनीकरण करण्यात आले. परंतु, अद्याप प्लॅटफॉर्म क्र. 2 व 3 येथे छत नाही. तसेच रेल्वे दुरुस्तीसाठीचे शेड नसल्याने अनेक अडचणी येत होत्या. त्या दूर करण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरणार आहे.
नैर्त्रुत्य विभागासाठी 675 कोटी
नैर्त्रुत्य रेल्वे विभागामध्ये बेंगळूर, म्हैसूर व हुबळी असे तीन उपविभाग करण्यात आले आहेत. प्रत्येक विभागातील पंधरा रेल्वेस्थानकांचा समावेश या योजनेत करण्यात आला आहे. प्रत्येक रेल्वेस्थानकाला 10 ते 15 कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. नैर्त्रुत्य रेल्वे विभागाला यासाठी 675 कोटी रुपये निधी देण्यात येणार आहे. रेल्वेस्थानकावर प्लॅटफॉर्मचा विस्तार, पादचारी ओव्हरपास ब्रिज, प्रतीक्षालय, सुसज्ज प्रवेशद्वार, प्लॅटफॉर्मवर वृद्धांसाठी इलेक्ट्रिक वाहन, आधुनिक स्वच्छतागृह, वायफाय यासह इतर सुविधा दिल्या जाणार आहेत. रेल्वेस्थानक परिसरात छोटे उद्यान, पार्किंगची व्यवस्था, रिक्षास्टँड, तसेच उपाहारगृहाची व्यवस्था केली जाणार आहे. 2025 पर्यंत अमृत भारत स्टेशन योजनेतील विकासकामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट नैर्त्रुत्य विभागाने ठेवले आहे.
विमानतळ टर्मिनलप्रमाणे रेल्वेस्थानकांना नवे रूप मिळणार
अमृत भारत स्टेशन योजनेतून रेल्वेस्थानकांचा विकास केला जाणार आहे. विमानतळ टर्मिनलप्रमाणे रेल्वेस्थानकांना नवे रूप दिले जाणार आहे. प्रवाशांना अत्याधुनिक सेवा-सुविधा पुरविण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरणार आहे.
- मंजुनाथ कलमाडी (मुख्य जनसंपर्क अधिकारी, नैर्त्रुत्य रेल्वे)