आमदार व्हेंझी यांच्याकडून खीळ घालण्याचा प्रयत्न
भाजप प्रवक्ते गिरीराज वेर्णेकर यांची टीका
पणजी : नागरिकत्व दुऊस्ती कायद्याशी संबंधित नियमांच्या अधिसूचनेवर आमदार व्हेंझी व्हिएगश यांनी केलेला विरोध म्हणजे संसदेच्या अधिकाराला खीळ घालण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका भाजप प्रवक्ते गिरीराज वेर्णेकर यांनी केली आहे. स्वत: एक लोकप्रतिनिधी असतानाही व्हिएगश यांनी अशा प्रकारची वक्तव्ये करणे खरोखरच खेदजनक आहेत, असेही वेर्णेकर यांनी पुढे म्हटले आहे. भाजपने नागरिकत्व दुऊस्ती कायदा गुप्तपणे सादर केलेला नाही. त्यासंबंधी यापूर्वीच त्यांनी जाहीरनाम्याद्वारे देशवासियांनी आश्वस्त केले होते. त्यापैकी कलम 370 रद्द करणे, अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम, नागरिकत्व दुऊस्ती कायदा यासारखी आश्वासने दिली आणि ती पूर्ण केली आहेत, असे वेर्णेकर यांनी म्हटले आहे. सीएए खास करून भारतात आश्रय घेतलेल्या अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश येथील धार्मिक अल्पसंख्याकांना जलद नागरिकत्व प्रदान करते. धार्मिक अल्पसंख्याक असल्यामुळे या लोकांवर त्यांच्या मूळ देशात मोठ्या प्रमाणात छळ झालेला आहे. त्यामुळे ते भारताला सुरक्षित आश्रयस्थान मानत असल्याने सीएए त्यांना नागरिकत्वाचे अधिकार प्रदान करते. असे वेर्णेकर यांनी म्हटले आहे. अशावेळी अल्पसंख्याक विरोधी म्हणून भारताची बदनामी करण्याचे प्रयत्न स्पष्टपणे नाकारले जातील आणि येत्या लोकसभा निवडणुकीत एनडीए 400 हून अधिक जागा मिळवून देऊन लोक पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना भरभरून पाठिंबा देतील, असा विश्वास वेर्णेकर यांनी व्यक्त केला आहे.