अटकेच्या 8 महिन्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा
सेंथिल बालाजी यांनी उचलले पाऊल
वृत्तसंस्था/ चेन्नई
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तुरुंगात कैद व्ही. सेंथिल बालाजी यांनी स्वत:ला अटक झाल्याच्या 8 महिन्यांनी अखेरीस तामिळनाडू मंत्रिमंडळाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. बालाजी यांच्या राजीनाम्याची पुष्टी मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. आता बालाजी यांचा राजीनामा राज्यपालांकडे पाठविण्यात येणार आहे.
14 फेब्रुवारी रोजी मद्रास उच्च न्यायालयात बालाजी यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी होणार आहे. यापूर्वी सत्र न्यायालयाने बालाजी यांची जामीन याचिका फेटाळली आहे. उच्च न्यायालयात व्ही. सेंथिल बालाजी यांच्या जामीन याचिकेवर न्यायाधीश आनंद वेंकटेश हे सुनावणी करणार आहेत. न्यायाधीश वेंकटेश यानी अलिकडेच अटकेनंतरही बालाजी मंत्रिपदावर कायम राहिल्याने टीका केली होती. दीर्घकाळापासून तुरुंगात कैद नेता मंत्रिमंडळात सामील असल्याने राज्यातील प्रशासन तसेच कायदा सुव्यवस्थेवरून न्यायाधीशांनी चिंता व्यक्त केली होती.
जूनमध्ये झाली होती अटक
ईडीने जून महिन्यात बालाजी यांना अटक केली होती. 2014 मध्ये अण्णाद्रमुक सरकारमध्ये परिवहन मंत्री असताना बालाजी यांनी मेट्रोपोलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनमध्ये लाच घेऊन लोकांना नोकरी मिळवून देण्याचे आरोप केले होते. बालाजी यांनी मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप आहे. बालाजी यांना ईडीने अटक केल्यावर द्रमुककडून संताप व्यक्त करण्यात आला होता.