मयेतील खनिज वाहतूक पुन्हा रोखली
सहा जणांना अटक, सुटका : गोवा फॉरवर्डचे नेते संतोषकुमार सावंत यांचा समावेश
डिचोली./ प्रतिनिधी
मये गावातून डिचोली, सांखळीमार्गे होणारी खनिज वाहतूक काल शनिवारी सकाळी मये गावातील स्थानिकांनी पुन्हा केळबाईवाडा येथे अडवली. रस्त्यावरून धावणारे ट्रक अडवून सरकारच्या दादागिरीचा निषेध केला. या प्रकरणी डिचोली पोलिसांनी उपजिल्हाधिकारी रोहन कासकर यांच्या सूचनेप्रमाणे मयेतील गोवा फॉरवर्डचे नेते संतोषकुमार सावंत यांच्यासह सहा जणांना अटक केली. उच्च न्यायालयाने मये गावातून खनिज वाहतूक नेण्यासाठी दिलेल्या स्थगिती आदेशाचा अवमान केल्याचा आरोप यावेळी स्थानिकांनी केला.
मये गावातून गेल्या सोमवारपासून खनिज वाहतूक सुरू आहे. त्यामुळे सध्या मये गावात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. मंगळवारी केळबाईवाडा येथे मयेतील नागरिकांनी ही खनिज वाहतूक अडवली होती. त्यानंतर मामलेदार राजाराम परब यांनी मये येथे धाव घेऊन वाहतूक अडविलेल्या नागरिकांशी चर्चा केली होती. त्यावेळीही या नागरिकांनी उच्च न्यायालयाच्या स्थगिती आदेशानंतरही ही वाहतूक कशी चालू झाली असा प्रश्न मामलेदारांना केला होता. त्यावर मामलेदारही अनुत्तरित राहिले होते. त्यांनी समजूत घातल्यानंतर दुपारी सदर अडविण्यात आलेली खनिज वाहतूक सोडण्यात आली होती. त्यानंतर बुधवारी या खनिज वाहतुकीमुळे केळबाईवाडा येथे जलवाहिनी फुटली होती. तिची संध्याकाळपर्यंत दुरूस्ती करण्यात आली. तसेच त्याच दिवशी स्थानिकांनी या खनिज वाहतुकीविरोधात डिचोली उपजिल्हाधिकारी, मामलेदार यांना निवेदने सादर केली होती.
शनिवारी पुन्हा अडवली खनिज वाहतूक
उपजिल्हाधिकारी व मामलेदारांना निवेदने सादर करूनही कोणतीही पावले उचलण्यात न आल्याने काल शनिवारी सकाळी स्थानिक नागरिकांनी तसेच मयेतील गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते संतोषकुमार सावंत यांच्या नेतृत्वाखाली केळबाईवाडा मये येथे खनिज वाहतूक करणारे ट्रक अडविले. त्यामुळे या भागात वातावरण तणावाचे बनले.
मोठा पोलीस फौजफाटा दाखल
मयेत खनिज वाहतूक अडविताच डिचोली पोलीस स्थानकातून मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा मयेत दाखल करण्यात आला. त्यामुळे केळबाईवाडा येथे छावणीचे स्वरूप आले होते. रस्त्याच्या दुतर्फा पोलिसांनी उभे राहून खनिज वाहतुकीला संरक्षण दिले. यावेळी उपजिल्हाधिकारी रोहन कासकर, मामलेदार अभिजित गावकर, संयुक्त मामलेदार श्रीपाद माजिक, पोलीस निरीक्षक दिनेश गडेकर व इतर पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
सहा जणांना अटक, सुटका
या खनिज वाहतुकीला विरोध करून अडविण्यासाठी पुढाकार घेतलेल्या संतोषकुमार सावंत यांनी घटनास्थळी हजर झालेल्या उपजिल्हाधिकारी कासकर व मामलेदार गावकर यांच्याकडे या रस्त्यावरून खनिज माल वाहतूक करण्यासाठी खाण खात्याने परवानगी दिली असल्यास त्याची प्रत सादर करण्याची मागणी केली. अन्यथा ही बेकायदेशीर व धोकादायक खनिज वाहतूक करू देणार नाही, असा पवित्रा घेतला. त्यामुळे त्यांना ताब्यात घेण्याची सूचना उपजिल्हाधिकारी कासकर यांनी दिली. डिचोली पोलिसांनी या सूचनेवरून संतोषकुमार सावंत, आपा साळगावकर, अजित सावंत, बाबुसो कारबोटकर, संतोष मालवणकर, नागेश नाईक यांना अटक केली. त्यांना दिवसभर डिचोली पोलीस स्थानकात ठेवल्यानंतर संध्याकाळी उपजिल्हाधिक्रायांकडे सादर करून सोडण्यात आले.
5 कि.मी. सोडून 30 कि.मी अंतराची वाहतूक कशाला?
मयेत गेल्या 2022 साली अशाच प्रकारे बेसुमार खनिज वाहतूक झाल्याने गावातील लोक संतप्त बनले होते. त्यावेळी जागरूक नागरिकांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर या मये गावातील अंतर्गत रस्त्यातून होणाऱ्या खनिज वाहतुकीला न्यायालयाने स्थगिती दिली होती. त्यानंतर न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात सदर मालाची वाहतूक पैरा, शिरगाव येथून जवळच असलेल्या सिकेरी येथील जेटीवरून नेणार असल्याचे म्हटले आहे. हे अंतर केवळ 5 कि.मी. भरते. ही अत्यंत सोपी प्रक्रिया असताना गावातील रस्त्यांवरून, शहरातून सुमारे 30 कि.मी. अंतर कापून खनिज वाहतूक नेण्याचे कारण काय? यात कोणाला कशा प्रकारचा फायदा आहे? हे सरकारने व संबंधितांनी स्पष्ट करावे, अशी मागणी गोवा फॉरवर्डचे नेते संतोषकुमार सावंत यांनी केली.
आमदारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी : संतोषकुमार सावंत
आज या गावाला या खनिज वाहतुकीपासून संरक्षण देणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत आमदारांकडून काहीच हालचाली दिसून येत नाहीत. मयेच्या आमदारांनी या खनिज वाहतुकीविषयी आपली भूमिका स्पष्ट करावी व यात काहीही काळेबेरे नसल्याचे स्पष्ट करावे, अशी मागणी गोवा फॉरवर्डचे नेते संतोषकुमार सावंत यांनी केली.
खाण व्यवसायातील बेकायदेशीरपणा विधानसभेत उघड करणार : विजय सरदेसाई
सध्या गोव्यात खाणी सुरू करण्याच्या प्रक्रियेत सरकारकडून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणा सुरू आहे. सर्वांना अंधारात ठेऊन सरकार आपणास हवे असलेल्या पद्धतीने वागत आहे. मये गावातून होणारी खनिज वाहतूक ही पूर्णपणे बेकायदेशीर आहे. लोकांच्या जीवनाशी खेळून व न्यायालयाचा स्थगिती आदेश धुडकावून होणाऱ्या या खनिज वाहतुकीचा विषय येणाऱ्या विधानसभा अधिवेशनात उघड करणार, असा इशारा आमदार विजय सरदेसाई यांनी दिला आहे.
गावातील लोकांच्या सुरक्षिततेची आम्हाला चिंता : नागेश नाईक
मये गावातून होणारी खनिज वाहतूक ही स्थानिक नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक व असुरक्षित आहे. गेल्यावेळी या खनिज वाहतुकीमुळे मयेतील विविध ठिकाणी जलवाहिनी फुटली होती. तसेच विविध लहानसहान अपघात घडले होते. या वाहतुकीमुळे मये गावातील लोकांना धोका असल्याने आम्ही त्याला विरोध करीत आहे. आम्ही खाणींच्या विरोधात नाही, असे स्थानिक नागरिक नागेश नाईक म्हणाले.