भारत-चीनदरम्यान सैन्यस्तरीय चर्चा
एलएसीवर शांतता राखण्यासमवेत अनेक मुद्द्यांवर सहमती
वृत्तसंस्था/ लेह
भारत आणि चीन यांच्यात सीमेवर असलेल्या तणावादरम्यान दोन्ही देशांकडून पुन्हा एकदा उच्चस्तरीय सैन्यचर्चा करण्यात आली आहे. भारत आणि चीनने पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक झालेल्या सैन्य चर्चेत अनेक मुद्द्यांवर सहमती व्यक्त केली आहे.
एलएसीला लागून असलेल्या क्षेत्रांमध्ये शांतता कायम राखण्यावर दोन्ही देशांनी जोर दिला आहे. तर मागील तीन वर्षांपेक्षा अधिक काळापासून वाद निर्माण झालेल्या मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी कुठलीही स्पष्ट पावले उचलण्यात आली नसल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.
भारत-चीन यांच्यात कोअर कमांडर स्तरीय चर्चेची 21 वी फेरी पार पडली आहे. ही बैठक चुशुल-मोल्डो सेमेवर आयोजित करण्यात आली होती. मागील फेरीत झालेल्या चर्चेवेळी भारत-चीन सीमावर्ती क्षेत्रांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी एलएसी नजीकच्या उर्वरित क्षेत्रातून पूर्णपणे मागे हटण्याची मागणी करण्यात आली होती.
दोन्ही देशांच्या शिष्टमंडळांनी मैत्रीपूर्ण आणि सौहार्दपूर्ण वातावरणात झालेल्या चर्चेत या मुद्द्यांवर स्वत:चे विचार मांडले आहेत. दोन्ही देशांनी सैन्य आणि राजनयिक माध्यमातून पुढील चर्चा सुरूच ठेवण्यावर सहमती व्यक्त केली आहे. याचबरोबर सीमावर्ती क्षेत्रांमध्ये शांतता कायम राखण्यावर प्रतिबद्धता व्यक्त करण्यात आल्याचे विदेश मंत्रालयाकडून सांगण्यात आले.