आसामसह परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
आसाममधील कार्बी आंगलांग जिल्ह्यात शुक्रवार आणि शनिवारी मध्यरात्री भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, पहाटे 2:40 च्या सुमारास भूकंपाची नोंद झाली. त्याचा केंद्रबिंदू कार्बी आंगलांगमध्ये 25 किमी खोलीवर होता. भूकंपमापन केंद्रावर याची तीव्रता 2.9 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. या नैसर्गिक आपत्तीमध्ये अद्याप कोणतेही नुकसान किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. यापूर्वी जम्मू-काश्मीर आणि नागालँडमध्ये गुरुवार, 28 नोव्हेंबर रोजी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. अफगाणिस्तानमध्ये 5.8 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाल्यानंतर हे हादरे जाणवल्याचे निदर्शनास आले होते. हिमालयीन प्रदेशाच्या विविध भागात गुरुवारी दुपारी 04.19 च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षणानुसार भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तान-ताजिकिस्तान सीमावर्ती भागात होता. तसेच सकाळी 7.22 वाजता नागालँडमधील किफिरे येथे 3.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. तत्पूर्वी, सोमवारी सकाळी त्रिपुराच्या उत्तर जिल्ह्यातील दमचेरा भागात 3.6 रिश्टर स्केलचा भूकंपही झाला होता.