अजित पवार यांची म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांनी घेतली भेट
तातडीने सीमाप्रश्न सोडविण्याची केली मागणी
बेळगाव : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे शुक्रवारी चंदगड येथे आयोजित केलेल्या जनसन्मान यात्रेत भाग घेण्यासाठी आले होते. ते सांबरा विमानतळावरून चंदगडला गेले. त्यानंतर सायंकाळी पुन्हा सांबरा विमानतळावरून मुंबईला जात होते. यावेळी मुतगा येथील म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांनी भेट घेऊन सीमाप्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करू, याचबरोबर येथील मराठी भाषिकांच्या सदैव पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने चंदगड येथे जनसन्मान यात्रा आयोजित करण्यात आली होती.
त्यासाठी ते येथे आले होते. सांबरा विमानतळावरून ते जाणार असल्याची माहिती मुतगा येथील म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांना समजली. त्यानंतर समितीचे कार्यकर्ते सुधीर पाटील व इतर कार्यकर्त्यांनी सीमाप्रश्नाबाबत तातडीने महाराष्ट्र सरकारने लक्ष घालावे, हा प्रश्न तातडीने न्यायालयातून सोडवावा, अशी मागणी केली. सीमाप्रश्नासाठी गेली अनेक वर्षे आम्ही लढा देत आहोत. महाराष्ट्र सरकारला याबाबत निवेदने देण्यात आली. याचबरोबर आंदोलनेदेखील करण्यात आली आहेत. तरीदेखील अजूनही हा प्रश्न ताटकळत ठेवण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयात हा प्रश्न असून त्याठिकाणी महाराष्ट्राने आपली बाजू भक्कमपणे मांडणे गरजेचे आहे, असे सांगितले. त्यावर निश्चित तोडगा काढू, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. यावेळी त्यांच्यासोबत खासदार सुनील तटकरे, चंदगडचे आमदार राजेश पाटील हे उपस्थित होते.