For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

माध्यमांनी देशाची प्रतिमा उज्ज्वल बनवावी

06:58 AM Jul 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
माध्यमांनी देशाची प्रतिमा उज्ज्वल बनवावी
Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन  : बीकेसीत इंडियन न्यूज पेपर सोसायटीच्या आयएनएस टॉवरचे लोकार्पण

Advertisement

मुंबई : प्रतिनिधी

भारतातील माध्यमांनी जगात जाऊन देशाची प्रतिमा उज्ज्वल बनवावी अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुल येथील इंडियन न्युज पेपर सोसायटीच्या आयएनएस टॉवरचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उdदघाटन करण्यात आले यावेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आणि इंडियन न्यूजपेपर सोसायटीचे अध्यक्ष राकेश शर्मा उपस्थित होते. तसेच तरुण भारतचे समूह प्रमुख व सल्लागार संपादक, आयएनएसचे सदस्य डॉ. किरण ठाकुर, विजय दर्डा, फोरूनजी कामा, विवेक गोयंका, विलास मराठे, मेरी पॉल तसेच या इमारतीचे वास्तू विशारद राजा अडेरी यांची विशेष उपस्थिती होती.

Advertisement

यावेळी बोलताना मोदी म्हणाले की, आज भारत अशा एका टप्प्यावर आहे, जिथून पुढील 25 वर्षांचा प्रवास अत्यंत महत्त्वाचा आहे. या 25 वर्षांत भारत देश विकसित बनावा यासाठी वर्तमानपत्र व अन्य माध्यमांची भूमिकाही तितकीच मोठी असल्याचे स्पष्ट केले आहे.

ज्या देशांच्या नागरिकांमध्ये आपल्या सामर्थ्याबाबत आत्मविश्वास येतो, ते यशाची नवी उंची प्राप्त करू लागतात. आज भारतातही तेच होत आहे आणि त्यासाठी माध्यमांची भूमिका नेहमीच महत्त्वाची ठरली असल्याचे त्यांनी सांगितले.

स्वातंत्रलढ्यापासून माध्यमांचे योगदान

भारतातील माध्यमांनी देशाच्या स्वातंत्रलढ्यापासून आपले योगदान दिले आहे. जनसामान्यांना संघटित केले आहे. आज सरकार आणि माध्यम यांच्यात योग्य संवाद असला तर देशात नाही जगात त्याचा प्रभाव पडतो. आम्ही भारतात डिजिटल व्यवहाराला चालना देण्याची घोषणा केली. यावेळी अनेकांना वाटले हे शक्य होणार नाही, पण जनधन योजनेच्या माध्यमातून ज्यांचे बँकेत खाते नाही त्यांना बँकेत खाते उघडून त्यांना या व्यवहारासाठी प्रोत्साहित केले.

आज भारत डिजिटल व्यवहारात अग्रेसर असून जगाने याची नोंद घेतली असून यासाठी माध्यमांची भूमिका तितकीच महत्त्वाची ठरल्याचा उल्लेख मोदी यांनी केला. आज जगातील देश आपले तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी उत्सुक असून यापुढे माध्यमांनी जगात जाऊन देशाच्या प्रगतीचा आलेख उंचावण्यासाठी भूमिका घ्यावी, असे मोदी म्हणाले.

माध्यमातील डिजिटल क्रांतीमुळे  आता वर्तमानपत्रासाठी लागणार कागद  वाचत आहे. जागेची कोणतीही अडचण नाही. डिजिटल आवृत्तीमुळे काही क्षणात तुम्ही लोकांपर्यंत पोहचत असल्याचे मोदी यांनी सांगताना तुम्ही हा नवीन प्रयोग कराल आणि भारताची लोकशाही बळकट कराल. तुम्ही जेवढे खंबीरपणे काम कराल तेवढी देशाची प्रगती होईल, असे मोदी म्हणाले.

आपण अनेक योजना राबविल्या मग ती स्टार्टअप इंडिया असो किंवा स्टँडअप इंडिया असो, या योजनेच्या माध्यमातून देशाला दिशा मिळाली आणि यासाठी माध्यमांची भूमिका ही नेहमीच महत्त्वाची ठरली. अशा योजनांमुळे परदेशातील भारतीय वंशाच्या नागरिकांची प्रतिष्ठा आणि विश्वासार्हता देखील वाढली असल्याचे मोदी म्हणाले.

यावेळी मोदी यांनी आयएनएसच्या सर्व सदस्यांना शुभेच्छा देताना या नवीन इमारतीच्या वास्तूतून देशाच्या माध्यमांचा विस्तार अशी आशा व्यक्त केली. यावेळी आयएनएसचे अध्यक्ष राकेश शर्मा यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सर्वप्रथम सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले. शर्मा म्हणाले, आज देशातील सर्व राज्यातील वर्तमानपत्रे आपली जबाबदारी प्रामाणिकपने निभावत आहेत. त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. मात्र ते आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक आहेत. देशात आलेल्या कोरोना लाटेचा वर्तमानपत्रांना सगळ्यात मोठा फटका बसला अनेक वर्तमानपत्र यातून अद्यापही सावरली नसून याचा पंतप्रधानांनी विचार करावा.

काही दिवसापूर्वी आम्ही देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना निवेदन देताना माध्यमांसाठी काही सूचना केल्या होत्या. मात्र त्याबाबत अद्याप काही झाले नसल्याचे शर्मा यांनी पंतप्रधानाच्या निदर्शनास आणले. आगामी अर्थसंकल्पात याबाबत योग्य ती तरतूद करावी अशी मागणी केली. काही दिवसापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने काही विभागाच्या जाहिरातीसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या. मात्र याबाबत स्पष्टता नसल्याने याचा मोठा फटका हा वर्तमानपत्रांना बसत असल्याचे शर्मा यांनी निदर्शनास आणले.

Advertisement
Tags :

.