कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘बलसागर’ भारत होवो!

06:30 AM Aug 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भारताचे सैन्य, सशस्त्र दल व अत्याधुनिक शस्त्रसज्जतेमुळे गेल्या दशकात भारताने संरक्षण सिद्धतेच्या संदर्भात जागतिक स्तरावर आघाडी घेतली आहे. नुकताच लंडन येथे इंग्लंडच्या पुढाकाराने भारत-इंग्लंड दरम्यान झालेल्या व्यापक संरक्षण कराराने भारताचे संरक्षण क्षेत्रातील व्यापक महत्त्व आणि महात्म्य सर्वमान्य झाले व यातूनच बलशाली भारताचे नवे रुप व स्वरुप उभ्या जगाने पाहिले. कधी भारतावर राज्य गाजविलेल्या ब्रिटनला आज भारताशी संरक्षण संदर्भात धोरणात्मक करार करण्यासाठी पुढाकार घ्यावा लागणे ही बाब जगातील संरक्षण क्षेत्रातील दिग्गजांसाठी आचंबित करणारी तसेच भारताची संरक्षण क्षेत्रातील क्षमता व सिद्धता सर्वमान्य करणारी ठरली आहे.

Advertisement

भारताची संरक्षण सिद्धता व आपल्या सैनिकी तंत्रज्ञांचे कौशल्य जगासमोर नव्याने व प्रभावीपणे झळकले ते 6 मे 2025 रोजी. केवळ 25 मिनिटात भारताने पूर्वनियोजितपणे व अचूक स्वरुपात पाकिस्तानातील सर्वदूर व प्रसंगी आत शिरुन दहशतवाद्यांसह मुख्य संरक्षण केंद्रांवर हेरुन हल्ला करून पाकिस्तानी दहशतवाद्यांसह दहशतवादी केंद्रे भारताने नष्ट केली. एवढेच नव्हे तर एवढ्या वेळेत निर्णायक स्वरुपात युद्ध जिंकण्याचा इतिहाससुद्धा यानिमित्ताने भारताने रचला.

Advertisement

भारत आणि भारतीयांच्या संरक्षण सिद्धतेतील कौशल्य पाकिस्तानच्या मनात धडकी भरविणारे व उभ्या जगाला स्तिमित करणारे ठरले. भारताने 2016 मधील उरी येथील पाक पुरस्कृत दहशतवादी हल्ल्याला उत्तर म्हणून अशीच अचूक चढाई केल्याचे स्मरण यानिमित्ताने होणे स्वाभाविक होते. मात्र यावेळच्या भारताच्या कारवाईचे महत्त्वाचे वैशिष्ट्यां म्हणजे यावेळी भारताने आपल्या धोरणात्मक आक्रमकतेला विकसित तंत्र, तंत्रज्ञान, नियोजन व पाकिस्तानचे कमरतोड नुकसान करतानाच संरक्षणाला संपूर्ण सिद्धतेची साथ दिली.

याच्याच परिणामी निवृत्त मेजर जनरल व विख्यात संरक्षण तज्ञ राजन कोचर यांनी नमूद केल्यानुसार ‘ऑपरेशन सिंदूर’च्या निमित्ताने भारत आणि भारताच्या लष्करी सज्जतेला राजकीय स्थिरता, प्रशासकिय परिपक्वता, परराष्ट्रीय धोरणाची भक्कमता याची साथ मिळाल्यानेच ऑपरेशन सिंदूर अंतर्गत कारवाई केवळ संरक्षकच न राहता संरक्षण सज्ज सिद्ध झाली.

जाणकारांच्या मते सध्याच्या आंतरराष्ट्रीय संदर्भात लष्करी कारवाई सुरु करताना अथवा त्याचा प्रतिकार करतांना आर्थिक बाजू भरभक्कम असणे गरजेचे व  फायदेशीर ठरते. यावेळी भारताची प्रगत व प्रगतीशील आर्थिक व्यवस्था व सुस्थितीने भारताला मोठेच पाठबळ लाभले. भारताच्या अर्थव्यवस्थेची सध्याच 4 ट्रिलियन डॉलरकडे घोडदौड सुरु असून याची नोंद जग आणि जागतिक पातळीवर वेळोवेळी घेण्यात येत आहे. या आर्थिक प्रगतीलाच भारताच्या देश आणि जागतिक पातळीवरील उत्पादन वाहतूक व्यवस्थेची अव्वलता आता जगाने मान्य केली आहे. याचे प्रत्यंतर यावेळी नव्या संदर्भात आले.

ब्रिटनच्या पुढाकारातून नुकत्याच व नव्याने झालेल्या भारत-ब्रिटन संयुक्त कराराने भारताच्या आर्थिक, औद्योगिक व परराष्ट्र धोरणाची छाप पाश्चिमात्य देशांवर पडलेली दिसून येते. विशेषत: ट्रम्प-टॅरिफच्या गदारोळातही हे घडू शकले हे महत्त्वाचे आहे. यामुळे सिद्ध झालेली बाब म्हणजे जेव्हा भारताच्या सुरक्षा-संरक्षणाचा प्रश्न येतो त्यावेळी आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्था वा पाकिस्तान, अमेरिका, चीन वा रशिया यांना काय वाटते हे महत्त्वाचे न ठरता देश आणि देशवासियांना काय वाटते ते महत्त्वाचे ठरते. व नेमकी हीच बाब पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानसह डोनाल्ड ट्रंप यांच्या धमक्या-वल्गनांना बळी न पडता देश हितासाठी व देशाच्या संरक्षणासाठी काय महत्त्वाचे आहे त्यावरच विचार करून प्रत्यक्षात आणली. यातूनच बलशाली भारत नव्याने साकारला.

त्याचवेळी भारताने गेल्या सुमारे 10 वर्षात विविध प्रकारची प्रत्यक्षअप्रत्यक्षपणे आंतरराष्ट्रीय स्तरावरील आव्हानांचा सामना करावा लागू शकतो याचा सामग्रिक विचार करून त्यानुसारे देश आणि देशहितरक्षण यासाठी काय करावे लागू शकते याचा व्यापक विचार करून आपली सिद्धता केली आहे. या धोरणात्मक तयारीमध्ये देशाची भौगोलिक व सागरी सीमा, महत्त्वाची संशोधन केंद्र व औद्योगिक समुद्री बंदर, वाहतूक व्यवस्था इ. च्या सुरक्षा राखण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.

उदाहरणार्थ मुंबई-जेएनपीटी, कांडला ही बंदर स्थाने, सर्वात मोठी अशी जामनगर रिफायनरी, मुंबईतील भाभा अणू संशोधन केंद्र, राजस्थानमधील पोखरणसह ढोलेरा परिसरातील विशाल सौर ऊर्जा प्रकल्प, बाडमेर येथील रिफायनरी, दक्षिण भारतातील पारादीप व विशाखापट्टणम बंदर यांच्या संरक्षणाची विशेष काळजी या प्रकल्पांच्या निर्माण काळापासूनच घेतल्यामुळे त्यांचा उपयोग यावेळी प्रकर्षाने जाणवला व सिद्ध झाला. या प्रमुख प्रकल्पांच्या संरक्षण सिद्धतेत मिसाईल, क्षेपणास्त्रांसह द्रोणच्या माऱ्यापासून पुरवलेली भरभक्कम सिद्धतेची यशस्वी चाचणी ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने जगमान्य ठरली व भारत आणि भारतीयांच्या विशेष कौशल्याचा व बलशाली क्षमतेचा परिचय सर्वांना झाला. याच्याच जोडीला चीनसारख्या शेजारी देशांचा सर्वच बाबतीतील बेभवरशीपणा लक्षात घेता तांत्रिक क्षेत्रातील संरक्षणाला भारताने विशेष खबरदारी घेण्यासाठी देशांतर्गत तंत्रज्ञान क्षमता विकसित केली आहे. यामध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित अशी व्यापक सायबर सुरक्षा, आर्थिक व्यवहार योग्य पद्धतीने होण्यासाठी स्वयंसिद्ध तंत्रज्ञानावर आधारित यंत्रणा, आवश्यक ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्तेचा विकास व प्रयोग आणि त्याशिवाय अंतराळ क्षेत्रातील संशोधनाचा उपयोग आता भारत आणि तटीय सागरी क्षेत्राच्या संरक्षणासाठी केला जात आहे हे विशेष.

सद्यस्थितीतील भारताचे संरक्षण संदर्भातील बलशाली व स्वयंसिद्ध होण्याच्या संदर्भातील सिद्धता सप्रमाण सिद्ध करणारी बाब म्हणजे ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ च्या जागतिक स्तरावरील विविध देशाच्या संरक्षणात्मक दृष्ट्या सध्या असणाऱ्या व नजिकच्या भविष्यात होऊ शकणाऱ्या जोखमीच्या संदर्भात विशेष स्वरुपात प्रकाशित केलेल्या ‘जागतिक जोखीम अहवाल 2025’ नुसार विशेषत: 2024-25 च्या दरम्यान आशियाई देशांमध्ये झालेल्या वा सुरु असणाऱ्या युद्ध वा युद्धसदृश बंडाळीच्या पार्श्वभूमीवर संरक्षण सिद्धतेला प्रमुख औद्योगिक केंद्रांच्या सुरक्षेला तेवढेच महत्त्वाचे ठरेल, असा इशारा प्रामुख्याने दिला असून देशाच्या सीमेसह देशांतर्गत औद्योगिक व्यवसायाची प्रमुख व संवेदनशील प्रगती केंद्राचे संरक्षण तेवढेच महत्त्वाचे ठरेल असा सार्थ आणि सज्जड इशारा दिला आहे.  या साऱ्या पार्श्वभूमीवर पहलगाम व त्यानंतरच्या ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने ‘आकाश’ क्षेपणास्त्राचा यशस्वी व परिणामकारक उपयोग करून भारताने आपली बलशाली संरक्षण सिद्धता सिद्ध केली आहे. आता आव्हान आहे ‘आकाशा’ला गवसणी घालू शकणाऱ्या ‘ब्रह्मांडाचा’ संशोधनपर शोध घेण्याची!

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article