माटवे दाबोळीची इंधन गळती धाकतळेच्या मार्गाने जाण्याचा धोका
असुरक्षीततेच्या प्रश्नावर अद्याप शांतता
प्रतिनिधी/ वास्को
माटवे दाबोळी वास्कोतील इंधन गळती प्रकरण धाकतळेतील दुर्घटने इतकेच घातक प्रकरण असले तरी हे प्रकरण अद्याप कुणी गांभिर्यानेच घेतलेच नसल्याचे दिसत आहे. निष्काळजीपणामुळेच दाबोळीतील विहीरी प्रदुषीत झालेल्या आहेत. मात्र, ना कुणी कुणाविरूध्द तक्रार केलेली आहे ना पोलिसांनी कुणावर गुन्हे नोंद केलेला आहे. स्थानिक जनतेला भिती सतावत असली तरी अद्याप या गावात या प्रश्नावर शांतताच आहे. त्यामुळे माटवे दाबोळी गाव भविष्यात धाकतळेच्या मार्गाने जाण्याचा धोका आहे.
माटवे दाबोळी हा गाव मुरगाव तालुक्यातील चिखली पंचायत क्षेत्रातील छोटासा गाव असून डोंगराखाली हा गाव वसलेला असल्याने निसर्गरम्य आहे. विहीरी, झरे, ओहोळ, कुपनलीका या गावात आहेत. पाण्याचे प्रचंड साठे या गावात आहेत. एप्रील मे महिन्यातील उन्हाळ्यातही या गावातील जमीनीत सहज पाणी सापडते. या जल संपन्न गावाला कुणाची तरी नजर लागावी अशी घटना सात दिवसांपूर्वी प्रकर्षाने समोर आली. या गावातील विहीरींचे पाणी पेट घेऊ लागल्याने गावात खळबळ आणि भिती माजली. काही वर्षांपूर्वी वास्कोतीलच धाकतळे गावात जमीनीत पसरलेल्या इंधनाने उत्पात घडवला होता, त्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. धाकतळेतील त्या घटनांचा शेवट अगदी क्रूर पध्दतीने झाला होता. माटवे दाबोळी गावाची भौगोलीक स्थितीही दाबोळी सारखीच आहे. धाकतळे प्रमाणेच माटवे दाबोळी गावापासून काही अंतरावरील डोंगरावरून भूमीगत इंधन वाहिनी गेलेली आहे. धाकतळेला जसा इंधन वाहिनीने दगा दिला तसाच प्रकार माटवे दाबोळीच्या बाबतही घडलेला आहे. सध्या दाबोळीतील लोकांना आपल्या गावातील हक्काचे पाणी वापरता येत नाही. जमीन आणि पाण्यात शिरलेल्या इंधनामुळे असुरक्षीततेची भावनाही लोकांमध्ये आहे. येथील पाणी उपसणे आणि त्या गळतीचा शोध घेण्याचेही काम चालू आहे.
धाकतळेच्या इंधन दुर्घटनेची सुरवातही अशाच पध्दतीने झाली होती
दाबोळीतील लोकांना विहीरीतील पाण्याला उग्र वास येत असल्याचे काही महिन्यांपूर्वीच समजले होते. मात्र, लोकांनी हा विषय गांभिर्याने घेतला नव्हता. मात्र, आठ दिवसांपूर्वीच विषय उग्र बनला. विहीरींतील पाणीच पेटू लागले. सर्व विहीरींसह जलस्त्रोत प्रदुषीत झाल्याचे स्पष्ट झाले. पर्यावरणाचे कधीही भरून न येणारे नुकसान या घटनेने झालेले आहे. हे प्रदुषण धुवून काढण्याचेही प्रयत्न होतील. मात्र, गावाच्या डोंगर माथ्यावर इंधन वाहिनी असल्याने पर्यावरण आणि माणसांच्या जीवांची असुरक्षीतता कायम राहण्याचा धोका आहे. धाकतळे प्रकरणाची सुरवातही अशीच झालेली होती. 2001 सालच्या डिसेंबरमधील कोवळ्या थंडीत अगदी सकाळी लोकवस्तीतील एका विहीरीने अचानक पेट घेतल्याने वास्कोत खळबळ माजली होती. गोव्यातील ती पहिलीच घटना होती. त्यानंतर धाकतळेतील इतर विहीरीतील पाणी पेट घेतल्याचे उघडकीस आल्याने या घटनेचे गांभिर्य समजले होते. गंजून गेलेल्या इंधन वाहिनीला गळती लागल्यानेच त्या गावातील जमीनीत इंधन झिरपले होते. सुदैवाने त्या वेळी जीवीत व अन्य प्रकारची हानी झाली नव्हती. हळुहळु हा धोका दूर झाला होता. परंतु दहा वर्षांनंतर 2011 साली याच गावाच्या डोंगर माथ्यावरील नवीन भुमीगत इंधन वाहिनीला भगदाड पडल्याने पुन्हा गावातील जमीनीत इंधन झिरपले आणि दुर्घटनेला आमंत्रण मिळाले. विहीरी आणि नालाच नव्हे तर जमीनही पेट घेऊ लागली. सकाळच्या वेळी नाल्याच्या शेजारी खेळणारी दोन मुले होरपळून मरण पावली, काही मुले गंभीर जखमी झाली. शिवाय वरूणापुरीतील एका गेटबाहेर याच इंधनाचा भडका उडून नौदलाचे एक दांपत्य आणि एक भेलपूरीवालाही होरपळून मरण पावला होता.
इंधन वाहिनीची सुरक्षा गांभिर्याने घेण्याची गरज
वास्कोतील इंधन गळतीला अशी भिषण पाश्वभूमी आहे. त्यामुळे आता माटवे दाबोळी गावही धाकतळेच्या मार्गाने जाणार नाही ना अशी भिती लोकांना सतावत आहे. झुआरीनगरातील तेल टाक्यांना इंधन पुरवठा करणारी इंधन वाहिनी इतकी कमकुवत आहे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. या वाहिनीची देखभाल आणि सुरक्षा पाहण्यात येत नाही काय असाही प्रश्न उपस्थित होत आहे. ऐवढ्या मोठ्या प्रमाणात इंधन गळती होत असताना संबंधीत कंपनीच्या व्यवस्थापनाला जाग कशी काय येत नाही. ती इंधन वाहिनी आणि इंधन गळती या गोष्टींकडे दुर्लक्ष होत असल्यास धाकतळे प्रमाणेच माटवे दाबोळीलाही एक दिवस भयंकर दुर्घटनेला सामोरे जावे लागण्याचा धोका आहे. झेडआयएव्ही प्रा. लि. च्या तेल टाक्यांपर्यंत जाणारी इंधन वाहिनी सुरक्षीत नसल्याचे पुन्हा एका उघडकीस आले आहे. त्यामुळे माटवे दाबेळीचे प्रकरण गांभिर्याने घेण्याची गरज आहे.