For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मार्कंडेय ओसरली... पिके कुजली!

10:30 AM Aug 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
मार्कंडेय ओसरली    पिके कुजली
Advertisement

भातपिके पाण्याखाली : शेतकऱ्यांना फटका, दुबार लागवडीचे संकट,  सर्व्हे करून नुकसानभरपाईची मागणी

Advertisement

बेळगाव : मागील दोन दिवसापासून पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने मार्कंडेय हळूहळू ओसरु लागली आहे. त्यामुळे नदी काठावरील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र सर्रास नदीकाठावरील भात पीक कुजल्याने मोठा आर्थिक फटका बसला आहे. गतवर्षी  सुक्या तर यंदा ओल्या दुष्काळाला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागणार आहे. जुलै मध्यानंतर झालेल्या अति पावसामुळे नदी, नाले आणि जलाशयाच्या पाणी पातळीत वाढ झाली. राकसकोप जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रातही अधिक पाऊस झाल्याने जलाशयातील अतिरिक्त पाण्याचा विसर्ग मार्कंडेय नदीत करण्यात आला. त्यामुळे नदी तुडुंब भरून पूर परिस्थिती निर्माण झाली. विशेषत: नदीकाठावरील हजारो हेक्टरातील पिके 20 ते 25 दिवसांपासून पाण्याखाली आहेत. आता पूर हळूहळू ओसरु लागला आहे. त्यामुळे पिके कुजून दुर्गंधी सुटली आहे. नदी काठावर सर्वत्र पिके कुजलेली परिस्थिती पहावयास मिळत आहे. विशेषत: सर्वत्र भातपिकाला फटका बसला आहे. शिवाय ऊस पीक अद्यापही पाण्यात उभे आहे.

2019 आणि 2021 साली मार्कंडेय नदीला आलेल्या पुराचा शेतकऱ्यांना फटका बसला होता. पुन्हा यंदा आलेल्या पुराने त्यावेळची आठवण करून दिली आहे. गतवर्षी पावसाअभावी पिके सुकून गेली होती. सुक्या दुष्काळाला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले होते. त्यामुळे यंदा नदी काठावरील शेतकऱ्यांनी घाईगडबडीने रोप लागवड केली होती. मात्र जुलै मध्यानंतर झालेल्या मुसळधार पावसाने भात पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे पूर ओसरल्यानंतर दुबार लागवडीचे संकट शेतकऱ्यांसमोर उभे ठाकणार आहे.  विशेषत: लागवडीसाठी रोपांची टंचाई निर्माण होणार आहे. त्यामुळे काही क्षेत्र पडीक पडण्याची भीतीही आहे. तर नदीकाठावरील शिवारात अद्यापही चार ते पाच फूट पाणी आहे. त्यामध्ये भात लागवड करणे अशक्य आहे. विशेषत: तालुक्यातील  सोनोली, बेळगुंदी, बाची, कल्लेहोळ, सुळगा, तुरमुरी, उचगांव, हिंडलगा, मण्णूर, आंबेवाडी, अलतगा, कंग्राळी, जाफरवाडी, कडोली, होनगा, काकती भागातील नदी काठावर असलेल्या शेतकऱ्यांना यंदा मार्कंडेयच्या पुराचा फटका बसला आहे. हजारो हेक्टरातील ऊस, भात, भुईमूग, बटाटा, आदी पिके वाया गेली आहेत. त्यामुळे नदीकाठावरील पिकांचा सर्व्हे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांतून होत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.