जलतरणात महाराष्ट्राचा डंका
29 पदकांसह उपविजेतेपद :7 वी खेलो इंडिया युवा स्पर्धा, बिहार 2025
वृत्तसंस्था/ गया (बिहार)
महाराष्ट्राच्या जलतरणपटूंनी 7 व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत 7 सुवर्ण, 7 रौप्य व 15 कांस्य अशी एकूण 29 पदकांची लयलूट सर्वसाधारण उपविजेतेपद पटकाविले. मुलींचा विभागात महाराष्ट्र-कर्नाटक संयुक्त विजेतेपद संपादन केले. एक सुवर्ण, दोन रौप्य व तीन कांस्य अशी एकूण 6 पदके जिंकली. 4 सुवर्ण 1 रौप्यांनतर अखेरच्या दिवशी कांस्य यशाने आदिती हेडगेने पदकांचा षटकार झळकविला.
बिपार्ड जलतरण तलावावर संपलेल्या जलतरणात .मुलांच्या विभागात कर्नाटकने 136 गुणांसह विजेतेपद पटकाविले, तर महाराष्ट्राने 65 गुणांसह उपविजेतेपद मिळवले. आंध्र प्रदेश संघाने 64 गुणांसह तिसरा क्रमांक पटकाविला. मुलींच्या विभागात महाराष्ट्र व कर्नाटक यांनी प्रत्येकी 156 गुणांची कमाई केली. या गटातील विजेतेपद उभय संघांना विभागून देण्यात आले. तमिळनाडूच्या मुलींनी 60 गुणांसह उपविजेपदाचा मान मिळविला.
शनाया शेट्टी हिने 34.67 सेकंद वेळेसह महाराष्ट्राला अखेरच्या दिवसातील एकमेव सुवर्णपदक जिंकून दिले. या गटात कर्नाटकची मानवी वर्मा (35.23 सेकंद) व तिचीच राज्य सहकारी विहिथा लोगनाथन (35.48 सेकंद) या अनुक्रमे रौप्य व कांस्यपदकाच्या मानकरी ठरल्या.
मुलांच्या 200 मीटर फ्रिस्टाईल प्रकारात महाराष्ट्राला दोन पदके मिळाली. धरीती अहिरराव हिने 2 मिनिटे 33.14 सेकंद वेळेसह रौप्य व निर्मयी आंबेटकर हिने 2 मिनिटे 25.21 सेकंद वेळेसह कांस्यपदक जिंकले. तमिळनाडूच्या रोशिनी बाळसुब्रमनियन हिने 2 मिनिटे 22.97 सेकंद वेळेसह सुवर्णपदकाची कमाई केली.
मुलींच्या 50 मीटर फ्रिस्टाईल प्रकारात श्रीलेखा पारीक (27.39 सेकंद) व अल्फेया धनसुरा (27.41 सेकंद) यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदकाची कमाई केली. कर्नाटकच्या ऋजुला एस हिने 27.12 सेकंद वेळेसह सुवर्ण पदकावर नाव कोरले. शिवाय मुलींच्या 1500 मीटर फ्रिस्टाईल प्रकारात महाराष्ट्राच्या आदिती हेगडे हिने 18 मिनिट 22.97 सेकंद वेळेसह कांस्यपदकाची कमाई केली. आदिती मुळे (18 मिनिटे 04.39) व श्री चरणी तमू (18 मिनिटे 19.29 सेकंद) या कर्नाटकच्या जलतरणपटूंनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदकाला गवसणी घातली.
वेटलिफ्टिंगमध्ये आकांक्षाला सुवर्ण, वेदिकाला कांस्य
राजगीर (बिहार) : नाशिकच्या मनमाडमधील व्यवहारे कुटुंबियांनी खेलो इंडिया युवा स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकण्याची परंपरा बिहारमध्येही कायम राखली. 7 व्या खेलो इंडिया युवा स्पर्धेत आकांक्षा व्यवहारेने 45 किलो गटात सुवर्ण, तर ठाणेच्या वेदिका टोळेने कांस्य यशाला गवसणी घातली.
राजगीर क्रीडा विद्यापीठाच्या परिसरात सुरू असलेल्या वेटलिफ्टिंग खेळातही पहिल्या दिवसापासून महाराष्ट्राचा डंका पहाण्यास मिळाला. 45 किलो गटात 9 पैकी 3 स्पर्धेक महाराष्ट्राचे होते. अपेक्षेप्रमाणे आकांक्षाने एकूण 148 किलो वजन उचलून सोनेरी यश पटकावले. 127 किलो वजनाची कामगिरी करीत वेदिका टोळेने तिसरे स्थान प्राप्त केले.
स्नॅच प्रकारात अपेक्षेप्रमाणे आकांक्षाने दमदार सुरूवात केली. तिसऱ्या प्रयत्नात सर्वाधिक 68 किलो वजन उचलून आकांक्षाने आपले वर्चस्व गाजवले. पाठोपाठ क्लिन अँन्ड जर्क प्रकारातही सर्वाधिक 80 किलो वजन उचलून आकांक्षाने सुवर्णपदकावर नाव कोरले. वेदिकाने स्नॅच प्रकारात 60 किलोची कामगिरी करीत दुसरे स्थान मिळवले होते. क्लिन अँन्ड जर्क प्रकारात 70 गुणांसह ती मागे पडली. केवळ 1 गुणांनी तिचे रौप्य पदक हुकले. पंजाबच्या लव्हजोत कौरने 128 गुण संपादून रौप्यपदकाचे यश संपादन केले.
टेबल टेनिसमध्ये काव्याचा सुवर्णधमाका कायम
राजगीर (बिहार) : टेबलटेनिसमध्ये अव्वल मानांकित खेळाडूंवर मात करीत महाराष्ट्राच्या काव्या भटने खेलो इंडिया युवा स्पर्धेत सुवर्ण पदकाचे शिखर सर केले. तामिळनाडूच्या एम हंसिनीला 4-1 गेमने पराभूत करून स्पर्धेतील सलग दुसरे सुवर्ण पदक जिंकण्याचा करिश्मा काव्याने घडविला. राजगीर क्रीडा विद्यापीठाच्या हॉलमध्ये संपलेल्या टेबलटेनिस स्पर्धेत सुवर्णासह कांस्य पदकाची कमाई महाराष्ट्राने केली. मुलींच्या एकेरीत दिव्याश्री भौमिकने कांस्य पदकाची कमाई केली. काव्या व दिव्याश्री हे स्पर्धेतील दुसरे पदक आहे. या जोडीने दुहेरीत सुवर्णपदक जिंकले होते.
दहा मीटर एअर रायफलमध्ये सुवर्णपदकाची हुलकावणी
पार्थ मानेने नेमबाजीच्या 10 मीटर एअर रायफलमध्ये रौप्यपदक जिंकून खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राला आणखी एक पदक जिंकून दिले. नवी दिल्लीतील कर्णी सिंग शुटिंग रेंजवर झालेल्या या स्पर्धेत मराठमोळ्या पार्थ माने याने पात्रता फेरीत 632.9 गुणांची कमाई करीत अव्वल स्थान पटकावित सुवर्णपदकाच्या आशा पल्लवित केल्या होत्या. मात्र, कर्नाटकच्या नरिन प्रणवने अंतिम फेरीच्या एलिमिनेटर राऊंडमध्ये मोक्याच्या वेळी अचूक कामगिरी करत 252.9 गुणांसह सुवर्णवेध साधला. पार्थ मानेला 251.9 गुणांसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.