शहरासह ग्रामीण भागात कमी वीजपुरवठा
हेस्कॉमच्या कारभाराचा सर्वसामान्यांना फटका : वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना जाब विचारणे गरजेचे
बेळगाव : शहरासह ग्रामीण भागात हेस्कॉमकडून पूर्वसूचना न देता वीजपुरवठा खंडित केला जात आहे. यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. उद्योग-व्यवसाय यांनाही हेस्कॉमच्या गलथान कारभाराचा फटका बसत आहे. सोमवारी शहरासह ग्रामीण भागातील काही गावांमध्ये कमी दाबाने वीजपुरवठा केला जात होता. यामुळे वॉशिंग मशीन, मिक्सर, इस्त्राr अशी उपकरणे चालत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली.
सोमवारी सकाळपासून हिंडलगा गणपती मंदिरापासून ते जयनगरपर्यंत कमी दाबाने वीजपुरवठा केला जात होता. यामुळे विद्युत मोटारीने टाकीमध्ये पाणी चढवणेही कठीण झाले. त्यामुळे काही नागरिकांनी हेस्कॉमच्या रेल्वेस्थानकासमोरील कार्यालयात फोन केला. परंतु, याबाबत त्यांच्याकडून स्पष्ट माहिती देण्यात आली नाही. त्यानंतर त्यांनी सेक्शन ऑफिसर तसेच अन्य अधिकाऱ्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनीही योग्य माहिती दिली नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
झाडाची फांदी पडल्याचे कारण
शहरातील अनगोळच्या मारुती गल्ली, झेरे गल्ली या परिसरात सोमवारी सकाळी कमी दाबाने वीजपुरवठा केला जात होता. त्यामुळे नागरिकांनी तक्रार केली असता एका झाडाची फांदी पडून विजेची समस्या निर्माण झाल्याचे उत्तर देण्यात आले. तालुक्यातील सावगाव, बेनकनहळ्ळी येथेही कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याची तक्रार केली. हेस्कॉमकडून समस्यांची योग्य प्रकारे दखल घेतली जात नसल्याची तक्रारही केली जात असल्याने आता अधिकाऱ्यांनीच कानउघाडणी करणे गरजेचे आहे.
फोन बाजूला ठेवण्याचा प्रकार
हेस्कॉमकडून संपर्कासाठी हेल्पलाईन नंबर देण्यात आले आहेत. परंतु, अनेक वेळा लँडलाईन क्रमांक सतत व्यस्त असल्याचे दिसून येते. काही नागरिकांनी कार्यालयात जाऊन पाहिले असता फोन बाजूला काढून ठेवण्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच फोन उचलला तरी समर्पक उत्तरे न देता बंद केला जातो. त्यामुळे आता वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच अशा कर्मचाऱ्यांना जाब विचारणे गरजेचे आहे.