41 हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान
45 पूल पाण्याखालीच : 4700 हून अधिक कुटुंबांचे काळजी केंद्रात स्थलांतर
प्रतिनिधी/ बेळगाव
जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम असून घरांच्या पडझडीसह मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. अनेक पूल अद्यापही पाण्याखाली असून याचा वाहतुकीवर परिणाम झाला आहे. जिल्ह्यामध्ये 41 हजार 700 हेक्टर क्षेत्रातील पिकांना पावसाचा फटका बसला आहे. तर 80 हेक्टर क्षेत्रातील बागायत पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यामध्ये 45 पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
जिल्ह्यात चार दिवसांपूर्वी पावसाचा जोर कमी झाल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत होते. गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा पावसाचा जोर वाढल्यामुळे जनजीवनावर परिणाम झाला आहे. शनिवारी पहाटेपासूनच पावसाचा जोर वाढला आहे. कृष्णा, मलप्रभा, घटप्रभा नद्यांच्या पाणीपातळीत काहीअंशी घट झाली असली तरी पुराचा धोका कायम असल्याने पुराच्या विळख्यात सापडलेल्या बहुतांश गावांमधील नागरिकांची काळजी केंद्रांमध्ये सोय केली आहे.
अथणी, रायबाग, चिकोडी, कागवाड, निपाणी, गोकाक, मुडलगी या तालुक्यांमधील 33 गावांतील नागरिकांचे काळजी केंद्रांमध्ये स्थलांतर करण्यात आले आहे. 4764 कुटुंबे 45 काळजी केंद्रांमध्ये स्थलांतरित झाली आहेत. 12,455 नागरिक काळजी केंद्रांमध्ये वास्तव्यास असून 5934 नागरिक नातेवाईकांच्या घरांमध्ये वास्तव्यास गेले आहेत. याबरोबरच चारा छावण्यांमध्ये जनावरांची सोय करण्यात आली आहे. अथणी, चिकोडी, मुडलगी तालुक्यातील 29 चारा छावण्यांमध्ये 16 हजार 488 जनावरांची सोय करण्यात आली आहे. याठिकाणी जनावरांसाठी चाराही उपलब्ध करून देण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाकडून काळजी केंद्रामध्ये वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांना आवश्यक सुविधा पुरविण्यावर भर देण्यात आला आहे.
15 तालुक्यांमध्ये 925 घरांची पडझड झाल्याची नोंद
पाण्याखाली गेलेल्या पुलांवरून वाहतुकीला निर्बंध घालण्यात आले आहेत. जिल्हा पोलिसांकडून ठिकठिकाणी धोकादायक वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. पावसामुळे घरांच्या पडझडीच्या घटना सुरूच आहेत. 15 तालुक्यांमध्ये 925 घरांची पडझड झाल्याची नोंद झाली असून 14 घरे जमीनदोस्त झाली आहेत. गेल्या 24 तासांत 136 घरांची पडझड झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे झाली आहे. पावसाचा जोर कायम असल्याने अनेक भागातील पिकांनाही धोका निर्माण झाला आहे. जुलै महिन्यामध्ये जिल्ह्यामध्ये 359 मि. मि. पावसाची नोंद झाली आहे.