लोकसभा निवडणूक प्रचाराला पूर्णविराम
अंतिम सातव्या टप्प्यात उद्या 57 जागांवर मतदान : 904 उमेदवार रिंगणात : जाहीर प्रचाराचा दणदणाट थांबला
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
मागील तब्बल 75 दिवस चाललेल्या लोकसभा निवडणूक 2024 च्या प्रचाराची गुऊवारी सायंकाळी 5 वाजता सांगता झाली. आता शनिवारी अंतिम फेरीचे मतदान होणार असून त्यानंतर सर्वांच्या नजरा मंगळवार, 4 जून रोजी लागणाऱ्या निकालाकडे लागतील. सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात शनिवार, 1 जून रोजी 57 जागांवर मतदान होणार आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघाचाही समावेश आहे. निवडणुकीच्या काळात मोठमोठ्या सभा, रोड शो यांचा झपाटाच विविध पक्षांनी लावला होता. या प्रचाराच्या अंतिम दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी, जेपी न•ा, योगी आदित्यनाथ आणि प्रियंका गांधी यांनी सभा घेतल्या. तर ममता बॅनर्जी यांनी कोलकाता येथे 8 किलोमीटर लांब पदयात्रा काढली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबमधील होशियारपूर येथे शेवटची सभा घेतली. तेथून पंतप्रधान मोदी कन्याकुमारीला रवाना झाले. आता पंतप्रधान पुढील 45 तास नेत ध्यानधारणा करतील. पंतप्रधान तेथून 1 जून रोजी दुपारी 3 वाजता निघतील. सातव्या टप्प्यात सात राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील 57 लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. यामध्ये उत्तर प्रदेश (13 जागा), बिहार (8 जागा), पंजाब (13 जागा), झारखंड (3 जागा), चंदीगड (1 जागा), पश्चिम बंगाल (9 जागा), ओडिशा (6 जागा) आणि हिमाचल प्रदेश (4 जागा) यांचा समावेश आहे. सर्व जागांसाठी मतदान सकाळी 7 वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी 6 वाजता संपेल.
अंतिम टप्प्यातही चुरसपूर्ण लढती
सातव्या टप्प्यात एकूण 904 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. यापैकी पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. तर मंडीमधून भाजपच्या कंगना रणौत आणि काँग्रेसचे विक्रमादित्य सिंग, गोरखपूरमधून भाजपचे रवी किशन आणि समाजवादीचे काजल निषाद, हमीरपूरमधून भाजपचे अनुराग ठाकूर आणि काँग्रेसचे सत्यपाल सिंह रायजादा आणि तृणमूल काँग्रेसचे अभिषेक बॅनर्जी आणि थेरेमंडमधून भाजपचे अभिजित दास यांच्यात चुरसपूर्ण लढती होत आहेत.
प्रचाराचा अंतिम दिवस
राहुल गांधी यांनी गुरुवारी सकाळी 11 वाजता ओडिशातील बालासोर येथे जाहीर सभेला संबोधित केले. त्यानंतर ते पंजाबमधील खतकर कलान येथील चौपाल गावात दुपारी 4 वाजता प्रचारात सहभागी झाले. ही त्यांची शेवटची निवडणूक प्रचारसभा ठरली. तर पंतप्रधान मोदींनी पंजाबमधील होशियारपूरमध्ये शेवटची निवडणूक प्रचारसभा घेतली. रॅलीत मोदींनी काँग्रेस आणि आपवर निशाणा साधला. 19 एप्रिलपासून देशात सात टप्प्यांत सुरू झालेली निवडणूक प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. 4 जून रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यानंतर देशात पुन्हा भाजपचे सरकार स्थापन होणार की भारतीय आघाडी चमत्कार घडवणार हे ठरेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या नेतृत्वाखालील रालोआ विक्रमी तिसऱ्यांदा सत्तेत येण्याचा प्रयत्न करत असून, 400 जागा जिंकण्याचे लक्ष्य आहे. तर, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्ष ‘इंडिया’ ब्लॉकच्या बॅनरखाली सत्ताधारी आघाडीला आव्हान देत आहेत. विरोधक सातत्याने सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल करत असून ‘इंडिया’ आघाडीच नवे सरकार स्थापन करणार असल्याचा दावा करत आहेत.
पंतप्रधानांच्या 206, राहुल गांधींच्या 107 सभा
प्रदीर्घ सात टप्प्यातील निवडणूक कार्यक्रमात सर्वच पक्षांच्या दिग्गजांनी प्रचारासाठी प्रचंड मेहनत घेतली. या काळात पंतप्रधान मोदींनी 206 सभा आणि रोड शो केले. अमित शहा यांनी 115 सभा आणि 18 रोड शो केले. विरोधकांबद्दल बोलायचे तर राहुल गांधींनी 107 सभा आणि रोड शो केले. अखिलेश यादव यांनी 69 सभा आणि 4 रोड शो केले, तर ममता बॅनर्जी यांनी 61 सभा आणि अनेक रोड शो करत पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून आले. भाजप अध्यक्ष जे. पी. न•ा यांनी 2 एप्रिल 2024 ते 30 मे 2024 पर्यंत 23 राज्ये आणि चार केंद्रशासित प्रदेशांना भेटी दिल्या. त्यांनी 125 लोकसभा जागांवर प्रचार करताना 134 निवडणूक सभा आणि रोड शो केले. निवडणुकीत न•ा यांनी एकूण 85,957 किलोमीटरचा प्रवास केला. या निवडणुकीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी 101 निवडणूक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्यांनी 94 सभा आणि सात रोड शो केले. एकंदर जवळपास दोन महिने चाललेल्या लोकशाहीच्या या महान पर्वात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ऊर्जेची तुलना इतर कोणत्याही नेत्याशी होताना दिसत नाही.
मुलाखतींमध्येही मोदीच ‘स्टार’
भाजपचे स्टार प्रचारक आणि सर्वेसर्वा पंतप्रधान मोदींनी विविध माध्यम संस्थांना 80 मुलाखती दिल्या. यामध्ये हिंदी, इंग्रजी आणि देशातील इतर भाषांमधील सर्व प्रकारच्या मीडिया संस्था, वर्तमानपत्रे आणि टीव्ही चॅनेलचा समावेश आहे. दुसरीकडे, काँग्रेसतर्फे राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे आणि प्रियांका गांधी हे काँग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक होते, परंतु तिघांनी मिळून पंतप्रधान मोदींइतकी सक्रियता दाखवली नाही. या निवडणुकीत राहुल गांधींनी केवळ एकच मुलाखत दिली. प्रियांका गांधी यांनी 28 सभा आणि 10 रोड शो केले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी 31 सभा घेतल्या.