खानापुरात पावसाच्या हलक्या सरी
जोरदार वाऱ्यामुळे जांबोटी नाक्यावर कोसळले झाड
खानापूर : खानापूर शहराला गुरुवारी वादळी वाऱ्यासह वळिवाने हजेरी लावली. मात्र जोरदार वाऱ्यामुळे म्हणावा तसा पाऊस पडलेला नाही. जोरदार वाऱ्याने जांबोटी नाका येथील कृषी खात्याच्या कार्यालयासमोरील मोठे झाड पडून वीजवाहिन्या तुटल्याने मोठे नुकसान झाले आहे. दुपारी दोन तास वीजपुरवठा खंडित झाला होता. गेल्या सात महिन्यांपासून खानापूर शहरवासीय जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. गुरुवारी दुपारी दीड वाजता जोरदार वादळी वारा सुरू झाला. आणि आकाशात काळे ढग दाटून आले. जोरदार वळिवाची बरसात होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. मात्र, हलक्या सरी कोसळल्यानंतर पावसाने पाठ फिरविली. त्यामुळे पुन्हा उष्मा वाढल्याने नागरिकांतून बेचैनी जाणवत होती. झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे जांबोटी नाका येथील कृषी खात्यासमोरील मोठे झाड उन्मळून पडले. मात्र सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे. हे झाड वीजवाहिन्यावर पडल्याने वीजवाहिन्या तुटल्याने शहर परिसरातील वीजपुरवठा दोन तास खंडित झाला होता. हेस्कॉमच्या कर्मचाऱ्यांनी तसेच वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी पडलेले झाड बाजूला सारून वाहतुकीसाठी रस्ताही मोकळा केला. शहरातील वीजपुरवठाही सुरळीत करण्यात आला.