दुहेरी खूनप्रकरणी दोन आरोपींना जन्मठेप
उच्च न्यायालयाने केला सत्र न्यायालयाचा निकाल कायम
- 2013 मधील मेरशी येथील गाजलेले खून प्रकरण
- खून करुन शिवाजी नाईकचा मृत्यू गाडला मेरशीत
- पत्नीचा खून करुन मृतदेह टाकला अनडमोड दरीत
पणजी : गोव्यात 2013 साली झालेल्या दुहेरी हत्याकांडात सत्र न्यायालयाने ओस्बान लुकास फर्नांडिस (मेरशी) व रमेश बागवे (मूळ मालवण) या दोघांना जन्मठेपेची ठोठावलेली शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने कायम ठेवण्याचा निवाडा जाहीर केला आहे. दुहेरी खुनाचे प्रकरण चांगलेच गाजले होते. मूळ कोल्हापूर येथील आणि मेरशीत वास्तव्यास असलेले शिवाजी नाईक या आपल्याच कर्मचाऱ्याचा खून आरोपी ओस्बान लुकास फर्नांडिस आणि रमेश बागवे या दोघांनी इतर संशयितांच्या मदतीने 9 मे 2013 रोजी रात्री 8 वाजता केला होता. पुरावा नष्ट करण्यासाठी शिवाजी नाईक याचा मृतदेह मेरशी येथील फर्नांडिस यांच्या मालकीच्या जमिनीत जेसीबीच्या मदतीने ख•ा खोदून गाडला होता.
अनमोड येथे पत्नीचाही खून
हा खुनाचा प्रकार 14 मे 2013 रोजी अनमोड-कर्नाटक येथे उघडकीस आला. त्यावेळी नाईक याचा खून केल्यानंतर त्याची पत्नी सुजाता आणि मुले वाच्यता करतील, या भीतीने आरोपींनी त्यांना मूळ गावी गडहिंग्लज - कोल्हापूर येथे पोहोचविण्याच्या बहाण्याने त्यांना 13 मे 2013 रोजी रात्री गाडीत घातले आणि अनमोड घाटात पोहोचताच आरोपीनी नाईक याच्या मुलांच्या डोळ्यांदेखत आईचा गळा आवळून खून केला आणि तिचा मृतदेह रस्त्याच्या बाजूच्या खोल दरीत फेकून दिला होता.
जुने गोवे पालिसांनी केली अटक
या प्रकरणी कुळे पोलीस स्थानकाचे तत्कालीन निरीक्षक जिवबा दळवी यांनी 14 मे 2013 रोजी जुने गोवे पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी शिवाजी याचा मृतदेह खड्ड्यातून वर काढला. या प्रकरणी जुने गोवे पोलीस स्थानकाचे तत्कालीन निरीक्षक देवेंद्र गाड यांनी संशयितांविरोधात भा.दं.सं.च्या कलम 143, 148, 342, 302, 201 आणि 149 नुसार गुन्हा दाखल करून आरोपी फर्नांडिस आणि बागवे या दोघांना अटक केली होती. त्यानंतर जुने गोवे पोलीस स्थानकाचे निवृत्त पोलीस निरीक्षक देवेंद्र गाड यांनी आणि नंतर कृष्णा सिनारी यांनी तपास करून पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.
जन्मठेपेची शिक्षा
त्यानंतर उत्तर गोवा जिल्हा सत्र न्यायालयाने 12 फेब्रुवारी 2015 रोजी इतर संशयितांना वगळून आरोपी ओस्बान लुकास फर्नांडिस व रमेश बागवे यांच्याविऊद्ध नाईक याचा खून करणे आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी दोषी ठरविले होते. त्यानंतर 31 ऑगस्ट 2020 रोजी दोन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. तसेच पुरावे नष्ट केल्याप्रकरणी भा.दं.सं.च्या कलम 201 नुसार तीन वर्षे साध्या कैदेची शिक्षा आणि 50 हजार ऊपये दंड अशी शिक्षा ठोठावली. या सर्व शिक्षा एकाच वेळी भोगायच्या आहेत, असे आदेशात म्हटले आहे. या व्यतिरिक्त दंडाची रक्कम जमा केल्यास ती रक्कम कुटुंबीयांना देण्याचा निर्देशही जारी केला आहे. या शिक्षेला दोन्ही आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाचे न्या. महेश सोनक आणि न्या. वाल्मिकी मिनेझीस यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने शुक्रवारी निवाडा देताना आव्हान याचिका फेटाळून लावली.
लहान मुलांमुळे खून प्रकरण आले उघडकीस
आरोपींनी शिवाजीची पत्नी सुजाता हिचा गळा आवळून खून केल्यानंतर तिचा मृतदेह रस्त्याच्या बाजूच्या खोल दरीत फेकून दिला होता. त्यानंतर काही अंतर पार केल्यानंतर आरोपींनी नाईक याच्या दोन्ही मुलांना कपडे काढून दरीत फेकून दिले. सुदैवाने ही दोन्ही मुले वाचली. रात्रीच्या दाट काळोखात दरीतून कसबसे वर येत या सात वर्षीय मुलीने आणि पाच वर्षीय मुलाने मुख्य रस्ता गाठला. त्यावेळी त्याच रस्त्यावरून लोंढयाहून मडगावकडे येणाऱ्या बॉनावॅन्चर डिसोझा यांनी 14 मे 2013 रोजी पहाटे वाचलेल्या या दोन्ही मुलांना मदत केली आणि कुळे पोलिसांना माहिती देऊन तक्रार दाखल केली होती. अशा पद्धतीने मुलांनी धाडसाने जबानी दिल्यामुळे शिवाजी नाईक आणि त्याच्या पत्नीचे खून प्रकरण उघडकीस आले.