पावसाने जनजीवन विस्कळीत
नदी-नाले तुडुंब : बळ्ळारी नाल्याला पुन्हा पुराचा धोका, उपनगरातील अनेक घरांमध्ये शिरले पाणी
बेळगाव : पावसाचा पुन्हा जोर वाढला असून शुक्रवारी दुपारनंतर पावसाने अक्षरश: झोडपून काढले. या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरून साऱ्यांचीच तारांबळ उडवून दिली आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे व शुक्रवारी झालेल्या धुवाधार पावसामुळे नदी-नाले तुडुंब झाले असून बळ्ळारी नाल्याच्या परिसरातील शिवाराला पूर आला आहे. यामुळे पुन्हा भातपीक पाण्याखाली गेले आहे. जोरदार पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते.
गेल्या चार दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. जोरदार सरी कोसळल्या तरी काही वेळानंतर पाऊस उसंत घेत होता. त्यामुळे पाण्याचा निचरा होत होता. मात्र शुक्रवारी दुपारी 12 नंतर पावसाच्या दमदार सरी कोसळल्या. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. गटारी तुडुंब भरून पाणी रस्त्यांवरून वाहत होते. शहरातील सखल भागांमध्ये गुडघाभरापेक्षाही अधिक पाणी साचून होते. त्यामधून वाट काढताना साऱ्यांनाच कसरत करावी लागत होती. शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचून होते. या दमदार पावसामुळे बाजारपेठेतील व्यावसायिकांची चांगलीच तारांबळ उडाली. फेरीवाले, भाजीविक्रेते यांच्यासह इतर व्यावसायिकांना पावसाचा त्रास सहन करावा लागला.
शुक्रवारी झालेल्या दमदार पावसामुळे मार्कंडेय नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. याचबरोबर शहरातील व तालुक्यातील नालेही तुडुंब भरून वाहत असून अधिक पाऊस झाल्यास पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सध्या मार्कंडेय नदीसह विविध नाल्यांच्या परिसरातील जमीन पाण्याखाली गेली आहे. शनिवारी पुन्हा या पाण्यामध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याने नदीकाठ-नाल्यांच्या परिसरातील शिवाराला फटका बसणार आहे.
जोरदार पावसामुळे एस. सी. मोटर्सजवळील मारुतीनगरमधील काही घरांमध्ये पाणी शिरले होते. रस्त्यावरही गुडघाभर पाणी साचून होते. अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने कुटुंबीयांना मोठी कसरत करावी लागली. पावसाचा जोर कायम असल्यामुळे भीतीच्या छायेखाली हे सारेजण वावरत आहेत. पावसाचा आणखी जोर वाढल्यास स्थलांतराशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले. या पावसामुळे हवेमध्येही कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. यावर्षी पहिल्यांदाच संततधार जोरदार पाऊस पडला. त्यामुळे सर्वत्रच पाणीच पाणी झाले. या पावसामुळे अनेक रस्त्यांची दैना झाली आहे. शहरातील लेंडी नाला व बळ्ळारी नालाही तुडुंब भरून वाहत आहे. या नाल्यांमध्ये कचरा व जलपर्णी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे अनेक ठिकाणी शिवारामध्ये पाणी शिरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.