लोहियांनी पेटविलेल्या क्रांतिच्या ज्योतीमुळे गोव्याला मुक्ती
मडगावातील क्रांतिदिन समारंभात पर्यावरणमंत्री आलेक्स सिकेरा यांचे उद्गार, मजबूत गोव्यासाठी सर्वांनी प्रेमाने, एकोप्याने नांदावे
मडगाव : 18 जून रोजी महान क्रांतिकारी डॉ. राम मनोहर लोहिया यांनी आपल्या भाषणाने गोमंतकीयांच्या मनात क्रांतीची ज्योत पेटविली. त्यामुळेच पुढे 1961 मध्ये गोवा मुक्त झाला व आम्हाला आमदार, मंत्री होणे शक्य झाले, असे प्रतिपादन पर्यावरणमंत्री आलेक्स सिकेरा यांनी केले. मडगावातील ऐतिहासिक लोहिया मैदानाच्या स्थळावरून डॉ. राम मनोहर लोहिया यांनी 18 जून रोजी गोमंतकीयांच्या हदयात क्रांतीची ज्योत पेटवली होती. त्या मैदानावर दरवर्षी क्रांतिदिनी शासकीय कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतो. यावेळी मंत्री सिकेरा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मडगावचे आमदार दिगंबर कामत, नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर, मडगावचे नगराध्यक्ष दामू शिरोडकर, जिल्हाधिकारी अश्विन चंद्रू,स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे अविनाश शिरोडकर व स्वातंत्र्यसैनिक व्यासपीठावर उपस्थित होते.यावेळी मंत्री सिकेरा यांनी गोवा मुक्तीसाठी राबविण्यात आलेले ऑपरेशन विजय तसेच गोवा मुक्तीच्या एकंदर इतिहासावर भाष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत गोमंतकीयांच्या उत्कर्षासाठी झटत असल्याचे सांगताना सर्व गोमंतकीयांनी मजबूत गोवा बनविण्यासाठी प्रेमाने आणि एकोप्याने नांदावे, असे आवाहन त्यांनी केले.