धर्म रक्षणासाठी प्रयत्न करूया : ह.भ.प. शिरीषराव मोरे महाराज
इचलकरंजी
धर्मांतरण होऊ नये आणि काही कारणास्तव हिंदू धर्मातून दूर गेलेल्यांना आता स्वगृही सन्मानपूर्वक आणायची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. जातीजातीमध्ये न विभागता संघटीतपणे धर्म रक्षणासाठी प्रयत्न करुया आणि प्रत्येकाने धर्माचरण करुया, असे आवाहन ह.भ.प. शिरीषराव मोरे महाराज यांनी केले. श्री रेणुकामाता दर्शन रथयात्रा समितीच्यावतीने खवरे मार्केट येथे झालेल्या दर्शन रथयात्रा सांगता समारंभाप्रसंगी ते बोलत होते.
ते म्हणाले, आई सर्वांसाठी एकच असते. रेणुका माता आपल्या सर्वांना दर्शनासाठी आली आहे. आपण भेदभाव न करता कुलाचार जपला पाहिजे. धर्मांतरण आणि धर्मावर आलेल्या संकटामुळे आपण विभागलो जात आहे. त्यामुळे धर्मांतरण होऊ नये आणि धर्मांतरण करणार्यांना विरोध करणे आपली जबाबदारी आहे. धर्मांतरणाला विरोध करण्यासाठीच ही यात्रा असून आपली रेणुका माता आपल्याला दर्शन देण्यासाठी आली आहे. त्यामुळे संघटीत राहून आपण हिंदू आहोत हे अभिमानाने सांगा. धर्मासाठी उभे रहा. आजवर अनेक संत, महात्मा झाले त्यांनी केवळ हिंदु धर्मासाठीच, हिंदु धर्माच्या रक्षणाचेच कार्य केले आहे.
यावेळी भाळवणी मठाचे अधीपती दादा महाराज, प.पू. बाळ महाराज यांनी भविष्यातील धोका लक्षात घेऊन प्रत्येक हिंदूने धर्मरक्षणासाठी संघटीत होण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास व्यासपीठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग सहसंघचालक भगतराम छाबडा, कणेरी मठाचे चिंदानंद स्वामी आदी उपस्थित होते.
दरम्यान, 20 डिसेंबर रोजी कोल्हापूरातून सुरू झालेली ही रथयात्रा 10 दिवसात 73 गावातून प्रवास करत रविवारी सकाळी येथील पंचगंगा नदीतीरावर पोहचली. त्यानंतर श्री रेणुका मंदिरातून सकाळी या रथयात्रेला प्रारंभ झाला. मुख्य मार्गावरून ही रथयात्रा कामगार चाळीत आल्यावर सांगता झाली. दुपारी शिवतीर्थावरून उदं ग आई उदंचा गजर करत महिला कलश यात्रेला भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. यामध्ये आमदार राहुल आवाडे, भाजपच्या महिला शहराध्यक्षा अश्विनी कुबडगे यांच्यासह हिंदूत्ववादी संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गे ही यात्रा खवरे मार्केटमध्ये पोहचल्यावर सभेत रुपांत झाले. या कार्यक्रमास भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार बापू महाराज यांनी मानले.