कडोली पशु आरोग्य केंद्राच्या इमारतीला गळती
उपचार तरी कसे करणार? अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, आलेला निधी धाडला माघारी
वार्ताहर /कडोली
कडोली येथील पशु आरोग्य केंद्राच्या इमारतीला गळती लागली असून नवीन इमारत बांधण्यासाठी मंजूर झालेला निधी जागेअभावी दोनवेळा परत गेला आहे. तरीपण या पशु आरोग्य केंद्राच्या दयनीय अवस्थेकडे कोणाकडूनही गांभीर्याने पाहिले जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तेंव्हा याकडे तातडीने लक्ष देवून सोय करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. कडोली हा कृषीप्रधान भाग म्हणून ओळखला जातो. या भागातील कडोली, जाफरवाडी, देवगिरी, गुंजेनहट्टी, केदनूर, मण्णिकेरी, बंबरगा, कट्टणभावी आदी ठिकाणी शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात होत असतो. या सर्व गावांचे कडोली हे प्रमुख पेंद्र आहे.
या कडोली गावात पशु आरोग्य केंद्र आणि कृषी केंद्र असणे गरजेचे असते. या केंद्राकडे ग्राम पंचायत आणि लोकप्रतिनिधींनी लक्ष ठेवणे गरजेचे आहे. कडोली गावात कृषी अधिकारी केंद्राचे ऑफीस सुरू होते. यामुळे शेतकऱ्यांची मोठी सोय होत होती. सर्व शेतीविषयक माहिती, औषधे, बी-बियाणे मिळत होती. काही वर्षे हे ऑफीस चालू होते. पण हे ऑफीस बंद करण्यात आले. याकडे तेवढे गांभीर्याने पाहिले गेले नाही. परिणामी कडोली परिसरातील शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आता कोणतेही शेतीपिक विषयक काम असेल तर काकती गाव गाठावे लागत आहे. इमारतीसाठी निधी मंजूर
पण जागेचा अभाव
कडोली परिसरात मोठ्याप्रमाणात जनावरांची संख्या असून पूर्वीपासून या ठिकाणी पशु आरोग्य केंद्र सुरू आहे. तेव्हापासून शेतकऱ्यांना या केंद्राचा लाभ मिळतो आहे. परंतु या केंद्राच्या इमारतीची अवस्था दयनीय झाली आहे. या इमारतीमध्ये सर्वत्र गळत्या सुरू आहेत. अशा गळतीच्या अवस्थेत पाण्यात पाय ठेवून आरोग्य अधिकाऱ्यांना दिवस काढावे लागत आहेत. येथील आरोग्याधिकारी गेली दोन वर्षे नूतन इमारत बांधण्यासाठी शासनाकडे निधी मंजूर करण्यासाठी प्रस्ताव पाठवत आहेत. शासनाकडून निधीही मंजूर केला जात आहे. परंतु जागेअभावी हा निधी पुन्हा वापस जात आहे. ज्या संस्थांपासून कोणताच फायदा नाही अशा संस्थांना ग्राम पंचायतीने आमराईतील जागा देवू केली आहे. पण कडोली भागासाठी आणि शेतकऱ्यांसाठी उपयोगी पडणाऱ्या पशु आरोग्य केंद्रासाठी मात्र जागा उपलब्ध करून दिली जात नाही. याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. सदर पशु आरोग्य केंद्रच दुसऱ्या गावाकडे स्थलांतरीत होऊ देत, याची तर वाट पहात बसले नाहीत ना? असा प्रश्न ग्रामस्थांतून उपस्थित केला जात आहे. तरी ग्राम पंचायतीने याची घेवून यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.