रुक्मिणीनगरमध्ये चौघांवर चाकूहल्ला
ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीनंतर दोन गटात राडा : भांडण सोडविण्यास गेलेल्यांनाही मारहाण
बेळगाव : ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीनंतर रुक्मिणीनगर येथे चौघा जणांवर जांबिया व कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे. रविवारी रात्री ही घटना घडली असून यासंबंधी पाच जणांविरुद्ध माळमारुती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. क्षुल्लक कारणावरून ही घटना घडली आहे. तन्वीर रियाज निजामी, शाकीर निजामुद्दीन, महम्मद कैफ नायक, साहिल भंडारी अशी जखमींची नावे आहेत. ते सर्वजण उज्ज्वलनगर, गांधीनगर परिसरातील असल्याचे पोलिसांनी सांगितले.
जखमी तन्वीरने दिलेल्या फिर्यादीवरून समीर मुल्ला, शाहरुखसह पाच जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता 189(3), 191(2), 191(3), 115(2), 109, 152, 151(3), सहकलम 109 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती समजताच माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची, उपनिरीक्षक होन्नाप्पा तळवार, श्रीशैल हुलगेरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. हल्ला प्रकरणातील आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. रविवार दि. 22 सप्टेंबर रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
परिसरात काहीकाळ तणाव
सर्व चारही जखमींवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. रात्री सिव्हिल हॉस्पिटल बाहेरही गर्दी जमली होती. एपीएमसीचे पोलीस निरीक्षक विश्वनाथ कब्बुरी व त्यांचे सहकारी रात्री उशिरापर्यंत सिव्हिल हॉस्पिटल परिसरात तळ ठोकून होते. ईद-ए-मिलादनिमित्त रुक्मिणीनगर परिसरात केलेली रोषणाई पाहताना झालेल्या भांडणानंतर जांबिया व चाकूने हल्ला करण्यात आला असून भांडण सोडविण्यासाठी आलेल्यांनाही मारहाण करण्यात आली आहे. या घटनेनंतर परिसरात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.