For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राज्योत्सव मिरवणुकीत चाकू हल्ला

06:54 AM Nov 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
राज्योत्सव मिरवणुकीत चाकू हल्ला
Advertisement

सदाशिवनगरजवळील प्रकार, पाच जण जखमी

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

शनिवारी रात्री राज्योत्सव मिरवणुकीत चाकू हल्ल्याची घटना घडली आहे. हल्ल्यात पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. दोघा जखमींना खासगी इस्पितळात हलविण्यात आले आहे. सदाशिवनगरजवळ ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

Advertisement

घटनेची माहिती समजताच पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे, कायदा व सुव्यवस्था विभागाचे उपायुक्त नारायण बरमणी यांनी सिव्हिल हॉस्पिटलला भेट देऊन जखमी तरुणांकडून घटनेसंबंधी माहिती घेतली आहे. चाकू हल्ल्याची घटना कोणी व कशासाठी केली? याचा उलगडा झाला नाही. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत, असे आयुक्तांनी सांगितले.

उपलब्ध माहितीनुसार नेहरुनगर येथील चित्ररथ मिरवणूक सदाशिवनगरला पोहोचली. लक्ष्मी कॉम्प्लेक्सहून चन्नम्मा सर्कलकडे जाताना मिरवणुकीत घुसलेल्या काही जणांनी चाकू हल्ला केला.  हल्ल्याच्या या घटनेमुळे एकच धावपळ सुरू झाली.  या घटनेत तिघेजण जखमी झाले आहेत. घटनास्थळावरून हाकेच्या अंतरावर वाय जंक्शनजवळ आणखी दोघा जणांवर चाकू हल्ला करण्यात आला आहे.

राघवेंद्र वक्कुंद ( वय 30, रा. वक्कुंद, ता. बैलहोंगल), सचिन कांबळे (वय 32 नेहऊनगर) , नजीर पठाण (वय 24 नेहऊनगर), लोकेश बेटगेरी (वय 35, संगमेश्वरनगर), प्रभाकर राऊरी (वय 33) अशी जखमींची नावे आहेत. ही घटना नेमकी कशासाठी झाली? चाकू हल्ला करणारे कोण? याची माहिती जमविण्यात येत आहे. पोलीस आयुक्तांनी अशा घटना टाळण्यासाठी मिरवणुकीत अँटीस्टॅबिंग स्क्वॉडही तैनात केले होते. गेल्या दोन वर्षांपासून चाकू हल्ल्याच्या घटना घडतच आल्या आहेत. त्यामुळे यंदा व्यापक खबरदारी घेण्यात आली होती.

शनिवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. डीजेच्या आवाजावरून झालेल्या भांडणानंतर चाकू हल्ल्याची घटना घडली आहे. एपीएमसीचे पोलीस निरीक्षक उस्मान आवटी, मार्केटचे पोलीस निरीक्षक महांतेश धामण्णावर यांच्यासह शहरातील इतर अधिकारीही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झाले असून रात्री उशिरापर्यंत सिव्हिल हॉस्पिटल बाहेर गर्दी जमली होती.

डीजेचा दणदणाट केला बंद

चाकू हल्ल्याच्या घटनेनंतर पोलिसांनी मुख्य मिरवणुकीतील डीजेचा दणदणाट बंद करण्यास सुरुवात केली. यामुळे रात्री 10.30 नंतर आवाज बंद करण्याची सूचना देऊन पोलिसांनी अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, याची खबरदारी घेतली.

Advertisement
Tags :

.