कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राजा, ईश्वरीतत्व जाणून घेण्यातच तुझ्या जीवनाचं सार्थक आहे

11:07 AM May 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अध्याय नववा

Advertisement

पूर्वीच्या ऋषीमुनींनी वेद आणि उपनिषदातून क्षेत्र व क्षेत्रज्ञ याविषयीचे विचार सविस्तर मांडलेले आहेत. हे ज्ञान अत्यंत पवित्र व परमोच्च असून जीवाला तृप्ती, पूर्णता देते. हे ज्ञान संपादन करण्यासाठी सरलता, गुरूपासून ज्ञान श्रवण करण्याची इच्छा, इंद्रियांच्या विषयांपासून विरक्ति, शौच, शान्ति, दंभाचा अभाव, जन्म व मृत्यु हे दोष आहेत असे जाणणे, समान दृष्टि, दृढ भक्ति, एकान्तवास, शम, दम ही लक्षणे आवश्यक आहेत असे सांगणारे आर्जवं गुरुशुश्रूषा विरक्तिश्चेन्द्रियार्थतऽ । शौचं क्षान्तिरदम्भश्च जन्मादिदोषवीक्षणम् ।। 24 ।। समदृष्टिर्दृढा भक्तिरेकान्तित्वं शमो दमऽ । एतैर्यच्च युतं ज्ञानं तज्ञानं विद्धि बाहुज ।। 25 ।। हे श्लोक आपण अभ्यासत आहोत. ज्याला आत्म्याचं स्वरूप जाणून घ्यायचंय तो विकारमुक्त असेल तर त्याला सर्वांच्यातला ईश्वर स्पष्ट दिसेल आणि त्याचा प्रत्येक व्यवहार प्रत्येकाच्या रूपात समोर ईश्वर वावरतोय हे लक्षात घेऊन होत राहील. विकारमुक्त मनुष्य सर्वांशी अत्यंत स्नेहानं वागत असतो. बरं, त्यासाठी त्याला वेगळे प्रयास करावे लागत नाहीत म्हणजे तो ठरवून चांगले वागत नसून तो त्याचा सहजस्वभाव असतो. आत्मज्ञानी व्यक्तीला वर सांगितल्याप्रमाणे ज्ञान झालेले असते. परंतु त्याच्यातील गुण उघडपणे दिसू शकत नाहीत. मात्र त्याच्या वागणुकीतून त्याच्या गुणांची झलक दिसून येते म्हणून त्याच्या वागणुकीचा अभ्यास आपण येथून पुढे करू.

Advertisement

तो सर्वांशी सरळ वागत असतो. आत एक बाहेर एक अशी दुटप्पी वागणूक तो कधीच ठेवत नाही. आत्मसाक्षात्कार होण्यासाठी तो तळमळत असतो आणि त्यासाठी सद्गुरू कृपा होणे आवश्यक आहे हे तो जाणून असल्याने त्याच्यासाठी सद्गुरु आज्ञा शिरसावंद्य असते. प्रारब्धानुसार जेव्हढे विषयसेवन वाट्याला येते तेव्हढेच तो करत असतो. स्वधर्माचरण कटाक्षाने चालू असते. त्यामुळे बोले तैसा चाले ही उक्ती तो सार्थ करत असतो. स्वत:च्या देहाविषयी त्याला ममत्व वाटत नसते. सुखदु:खाच्या प्रसंगात तो स्थिर असतो. भक्तीत निरनिराळ्या प्रकारची विघ्ने येत असतात. त्यावर तो धैर्याने मात करतो. शरीराची जेव्हढी अनुकूलता असेल तेव्हढीच भक्ती करत असतो. शरीराचे भोग शांतपणाने भोगत असतो. त्यातही ईश्वराशी अनुसंधान राखण्याचा प्रयत्न करत असतो. अशा मन:स्थितीत तो मोक्ष मिळवण्यासाठी धडपडत असतो. त्यासाठी कोणते ज्ञान होणे आवश्यक आहे त्याबद्दल बाप्पा राजाला पुढील श्लोकात सांगणार आहेत. ते म्हणाले,

तज्ञानविषयं राजन्ब्रवीमि त्वं शृणुष्व मे ।

यज्ञात्वैति च निर्वाणं मुक्त्वा संसृतिसागरम् ।।26 ।।

अर्थ-जे ज्ञान जाणले असता मनुष्य संसारसागर सोडून मोक्ष पावतो-ते मी तुला सांगतो, ऐक.

विवरण-संसारात अनेक गोष्टी असतात व त्यांची अत्यंत आवड असल्याने त्याबद्दल जाणून घ्यायला माणसाला आवडतं. ज्याप्रमाणे देवाच्या जत्रेमध्ये अनेक वस्तूंची दुकाने असतात, तऱ्हेतऱ्हेचे खेळ असतात, खाऊ खेळण्यांची दुकाने असतात. त्यामुळे कित्येक लोक तिथं रमत असतात. अगदी थोडे असे असतात की, जे या सगळ्याकडे दुर्लक्ष करून सरळ देवदर्शन घ्यायला निघून जातात. जणू त्यांना ही दुकाने दिसतच नसतात. त्यांच्या मनात फक्त देवदर्शनाची ओढ असते. बाप्पा वरेण्याला म्हणतायत जगात अनेक गोष्टी आहेत व त्याच्याबद्दल जाणून घ्यायला तुला आवडेल पण त्या जाणून घेण्यातच तुझं आयुष्य संपून जाईल. तरीही अनेक गोष्टी समजून घ्यायच्या राहून जातील म्हणून त्या सगळ्याकडे दुर्लक्ष कर व ईश्वरीतत्व जाणून घ्यायचा प्रयत्न कर. यातच तुझ्या जीवनाचं सार्थक आहे.

क्रमश:

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article