खेलो इंडिया पदक विजेते शासकीय नोकरीसाठी पात्र
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत पदक विजेते खेळाडू आता यापुढे शासकीय नोकरीसाठी पात्र ठरतील अशी घोषणा केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय क्रीडा क्षेत्राचा दर्जा सुधारण्यासाठी विविध क्रीडापटूंना मोठ्या प्रमाणात आर्थिक साहाय्य दिल्याने भारताने अलीकडेच नुकत्याच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पदकांची लयलूट करताना 100 पेक्षा जास्त पदके मिळवली. खेलो इंडिया स्पर्धेतील पदक विजेत्यांसाठी आता शासनाकडून शासकीय नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या जाणार असून याकरिता नियमामध्ये सुधारित बदल केले जाणार आहेत. क्रीडा मंत्रालयाशी सल्ला घेतल्यानंतरच विविध क्रीडा प्रकारातील क्रीडापटूंना प्रशिक्षणाची तरतूद केली जात आहे. आता देशातील क्रीडापटूंना शासकीय नोकऱ्या उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही अनुराग ठाकुर यांनी सांगितले. युवा, विद्यापीठ, पॅरा आणि हिवाळी खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेतील पदक विजेते शासकीय नोकरीसाठी यापुढे पात्र ठरतील. 2018 साली पहिल्यांदा मोदी शासनाकडून खेलो इंडिया स्पर्धा आपल्या देशामध्ये भरविली गेली, असेही ठाकुर यांनी सांगितले.