खानापूर-रामनगर रस्ताकाम पुन्हा रखडले
कंत्राटदारांच्या अंतर्गत वादाचा फटका : मे अखेरीस काम पूर्ण करण्याचा केला होता दावा
खानापूर : बेळगाव-गोवा महामार्गातील खानापूर-रामनगर या रस्त्याचे काम गेल्या दोन महिन्यापासून पुन्हा बंद पडले आहे. मुख्य कंत्राटदार म्हात्रे यांनी यशस्वीनी या कंत्राटदाराला खानापूर, रामनगर रस्त्याचे काम सोपवले होते. मात्र म्हात्रे आणि यशस्वीनी यांच्यातील अंतर्गत वादामुळे पुन्हा खानापूर, रामनगर महामार्गाचे काम रखडले आहे. गेल्या दोन महिन्यापासून हे काम पूर्णपणे बंद पडले असून, त्यामुळे पावसाळ्यापूर्वी हा रस्ता पूर्ण होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत राष्ट्रीय महामार्गाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कायमच कानाडोळा करण्यात येत असल्याने गेल्या सहा वर्षापासून या रस्त्याचे काम या ना त्या कारणाने रेंगाळले आहे. मात्र हेच अधिकारी टोल सुरू करण्यासाठी आघाडीवर होते. त्यामुळे खानापूर तालुक्यीतल नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. बेळगाव-गोवा रस्त्याच्या महामार्गाचे काम गेल्या सहा-सात वर्षापूर्वी सुरू झाले. यातील खानापूर-रामनगर या रस्त्याचे काम न्यायालयीन कचाट्यात सापडल्याने रेंगाळले होते. मात्र मागीलवर्षी पुन्हा नव्याने निविदा काढून पुणे येथील एम. व्ही. म्हात्रे यांना या कामाचे कंत्राट देण्यात आले. म्हात्रे यांनी हे काम यशस्वीनी या कंपनीला कामाचे सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम दिले होते. सुरुवातीपासूनच त्यांच्या कामाची गती पाहता वेळेत काम पूर्ण होणार नाही याबाबत वारंवार तक्रारी झाल्या होत्या. म्हात्रे आणि यशस्वीनी यांच्यातील व्यवहारावरील वारंवार खटके उडत होते. त्यामुळे याचा परिणाम रस्त्याच्या कामावर झालेला होता.
अंतर्गत वादाचा फटका प्रवाशांना का ?
दोनच दिवसापूर्वी गुंजी येथील माउली देवस्थानात म्हात्रे आणि यशस्वीनी यांच्यात बैठक होऊन यावर तोडगा निघाल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी रस्त्याच्या कामाच्या पूर्ततेबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने म्हात्रे यांना मे 2024 पर्यंत या रस्त्याचे काम पूर्ण करण्याची अट घातली होती. यानुसार म्हात्रे यांनी कायम आपण मे 24 पर्यंत कोणत्याही परिस्थितीत रस्त्याचे काम पूर्ण करू, असे सांगितले होते. मात्र होनकल ते रामनगर या रस्त्यावरील अनेक ठिकाणी कामे अर्धवट असून काही ठिकाणी पुलांची कामे अपूर्ण आहेत. तर लोंढा ते तिनईघाटपर्यंतच्या रस्त्याचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे पावसाळा तोंडावर असल्याने पुन्हा हे काम रखडणार असल्याने पुढील चार महिने वाहनधारकांना रस्त्यासाठी अतोनात हाल सहन करावे लागणार आहेत. म्हात्रे यांनी यशस्वीनी यांच्यातील अंतर्गत वादाचा फटका या भागातील नागरिकांना आणि प्रवाशाना सहन करावा लागत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने याबाबत गांभीर्याने घेऊन हा रस्ता पूर्ण करण्यासाठी कठोर पावले उचलणे गरजेचे आहे.