For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केजरीवाल दिल्लीविरोधी, महिलाविरोधी

12:10 PM May 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
केजरीवाल दिल्लीविरोधी  महिलाविरोधी
Advertisement

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा आरोप : स्वाती मलिवाल प्रकरणी दिले आव्हान,गोवा प्रदेश आपची मुख्यमंत्र्यांवर टीका

Advertisement

पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल बुधवारी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ‘आप’चे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर ‘केजरीवाल हे दिल्लीविरोधी आणि माहिलाविरोधी’ आहेत अशी टीका केली. आपच्या खासदार स्वाती मलिवाल यांना खुद्द मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या मारहाणप्रकरणी केजरीवाल मुग गिळून गप्प बसले असून त्यांनी मौन सोडावे. कारण त्यांचे मौन खूप काही सांगते म्हणून त्यांनी स्वत:हून त्याबाबत काय तो खुलासा करावा, अशी मागणीही डॉ. सावंत यांनी केली. आम आदमी पक्ष हा दिल्ली आणि महिलांच्या विरोधात आहे. त्या पक्षासोबत 20 वर्षे काम केलेल्या एका महिलेचे दिल्लीत मुख्यमंत्र्यांच्या निवासात शोषण होते. याबाबत मुख्यमंत्र्यांनी गप्प रहाणे हे लज्जास्पद गोष्ट आहे. केजरीवाल हे प्रकरण दाबून टाकू इच्छितात, असा आरोपही डॉ. सावंत यांनी केला आहे.

सोनी मिश्रा प्रकरण

Advertisement

मलिवाल प्रकरण संपुष्टात आणण्यासाठी केजरीवाल तडजोडीची भाषा बोलत असून दबाव टाकण्याचे काम चालू आहे. त्यांनी या आधी सोनी मिश्रा प्रकरणी देखील दबावाचे राजकारण केले होते. शेवटी तिने कंटाळून आत्महत्या केली होती, अशी माहिती डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. स्वाती मलिवाल प्रकरणात केजरीवाल यांचे माजी स्वीय सचिव विभव कुमार हे संशयित आहेत. ते कोणत्या अधिकाराने सरकारी निवासात वास्तव्यास आहेत? त्यांना कोणी लपवून ठेवले होते ? याची उत्तरे मिळालेली नाहीत. ती केजरीवाल यांनी दिलीच पाहिजे, असा आग्रह डॉ. सावंत यांनी केला आहे. या प्रकरणात सीसीटीव्हीचे कोरडे फुटेज दिल्ली पोलिसांना देण्यात आले तसेच विभव कुमार यांना केजरीवाल यांनी स्वत:च्या गाडीतून लखनौ येथे सोडले होते, असे डॉ. प्रमोद सावंत यानी नमूद केले.

गोव्याच्या ‘आप’ पदाधिकाऱ्यांचा पलटवार

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्लीत जाऊन ‘आप’चे तेथील मुख्यमंत्री केजरीवालांच्या विरोधात टीका केल्यानंतर गोव्यातील ‘आप’ नेत्यांनी डॉ. सावंत यांना लक्ष्य केले आहे. सावंत हे दिल्लीत जाऊन वाटेल ते बरळत असून दिल्लीतील जनतेने त्यांना हास्यास्पद ठरविले आहे, असा पलटवार आपचे गोवा प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर व पदाधिकारी वाल्मिकी नाईक यांनी केला आहे. दिल्लीची जनता जागृत असून त्यांना केजरीवाल कोण हे पक्के माहीत आहे. सावंत दिल्लीत काहीही बरळले तरी त्याचा कोणताही परिणाम आप किंवा केजरीवाल यांच्यावर होणार नाही. भाजप केजरीवाल आणि ‘आप’ला घाबरतो हेच त्यातून दिसून येते, अशी टिपणी नाईक यांनी केली आहे. डॉ. सावंत यांनी दिल्ली ऐवजी गोव्यात येऊन काय ते बोलावे. त्यांनी सिद्धी नाईक मृत्यू प्रकरणी विधाने करावीत. त्या प्रकरणात सावंत यांचे सरकार अपयशी ठरले असून चौकशीचे पुढे काय झाले ते सावंत यांनी सांगावे. गोव्यात महिलांचे हित जपण्यास आणि त्यांना सुरक्षा देण्यात सरकार अपयशी ठरल्याची टीका पालेकर यांनी केली आहे.

Advertisement
Tags :

.