केजरीवालांना अटक, ‘आप’चा उपवास
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीत सध्या आम आदमी पक्ष आणि भाजप यांच्यात जोरदार वाक्युद्ध सुरू आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक करण्यात आल्यावर आम आदमी पक्षाचे नेते आक्रमक झलो आहेत. पक्ष सातत्याने केजरीवालांच्या अटकेला विरोध करत त्यांच्या सुटकेची मागणी करत आहे. आम आदमी पक्ष सातत्याने ईडीची कारवाई आणि मोदी सरकारवर टीका करत आहे. याचदरम्यान आपने मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यासाठी एक दिवसाचा सामूहिक उपवास केला आहे.
राजधानी दिल्लीत जंतर-मंतरवर आप आमदार, नगरसेवक आणि नेत्यांनी सामूहिक उपवास केला, तर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी स्वत:च्या मंत्र्यांसोबत भगतसिंह यांचे गाव खटकडकलांमध्ये उपवास केला आहे. भारतासह अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, नॉर्वे, आयर्लंड, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडात राहणाऱ्या भारतीयांनाही केजरीवालांच्या सुटकेसाठी उपवास केल्याचा दावा आम आदमी पक्षाने केला आहे.
अरविंद केजरीवाल हे प्रामाणिक होते आणि राहतील. केजरीवाल हे मुख्यमंत्री होते आणि राहतील. बनावट प्रकरणात अटकेची कारवाई करण्यात आली आहे. दोन्ही तपास यंत्रणांचे 456 साक्षीदार आहेत, परंतु केवळ 4 साक्षीदारांनी केजरीवालांचे नाव घेतले आहे. कुठल्या परिस्थितीत या साक्षीदारांनी हे नाव घेतले हे देशाची जनता आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांना माहित असायला हवे असे उद्गार आप खासदार संजय सिंह यांनी काढले आहेत.
आम आदमी पक्षाने देशभरात करण्यात आलेल्या उपोषणाची छायाचित्रे जारी केली आहेत. अरविंद केजरीवालांच्या अटकेच्या विरोधात देशभरातील लोकांमध्ये आक्रोश असल्याचा दावा आपने केला आहे.