अलमट्टी धरणाच्या उंचीवर नियंत्रण ठेवा
सांगली :
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांना दरवर्षी महापुराच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. यामध्ये अलमट्टी धरणाच्या जलसाठ्यावर नियंत्रण नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होत आहे. यापार्श्वभूमीवर विधानपरिषदेचे आमदार अरुण लाड यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांची भेट घेतली. कर्नाटक सरकार अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याचा प्रयत्न करत असल्याबाबत तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
धरणाची उंची वाढविल्यास कृष्णा नदी काठच्या कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात पावसाळ्यात पूरस्थिती गंभीर बनते. २००५, २००६, २०१९ व २०२१ या वर्षात पुरामुळे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. यामध्ये धरणातून वेळेवर विसर्ग न केल्याचा आरोप आहे. याच मुद्यावरून अरुण लाड यांनी अलमट्टीचे परिचलन केंद्रीय जलआयोगाच्या २०१८च्या मॅन्युअलनुसार नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे, असे स्पष्ट केले.
- समिती स्थापन करण्याची मागणी
यावर निवेदनात उपाययोजना सुचवत लाड यांनी समिती स्थापनेची मागणी केली. कर्नाटक-महाराष्ट्रातील शासकीय, सेवानिवृत्त अधिकारी व स्वयंसेवी संस्था यांच्या समावेशाने उच्चस्तरीय समिती स्थापन करून महापुरावर अभ्यास करावा. उपाययोजना निश्चित करावी, अशी मागणी केली. तसेच केंद्रीय जल आयोगाच्या मार्गदर्शनाखाली अलमट्टीचे परिचलन व्हावे, हिप्परगी बॅरेजवरील अयोग्य पाणीसाठवण नियंत्रणात यावे यासाठीही उपाय सुचवले आहेत.
- आ. अरुण लाड यांनी मांडले पुढील मुद्दे
अलमट्टी धरणाची पाणीपातळी जुलै-ऑगस्ट दरम्यान ५१३ मीटर ठेवावी. जुलैमध्ये ५० टक्के, ऑगस्टमध्ये ७७ टक्के जलसाठा राखून हवामानानुसार सप्टेंबरनंतरच धरण भरावे. १९९९ पूर्वी गठित समित्यापैकी एका समितीनेही जलपातळी वाढवू नये असे स्पष्ट सुचवले होते. त्याचे उल्लंघन होत आहे. हिप्परगी बॅरेजमुळे राजापूर बंधाऱ्यावर परिणाम होतोय. नियमबाह्य अडथळ्यांवर कारवाई व्हावी. अलमट्टीचे माती बांधकाम ५२५ मीटरपर्यंत का आणि कशाच्या परवानग्यांनी केले, याचा खुलासा व्हावा.