Kolhapur News: पुलावरून उडी घेतलेल्या वृद्धास वाचवण्यात यश, कसबा बीडमधील घटना
उडी घेतलेल्या वृद्ध व्यक्तीस वाचवण्यात यश आले आहे
By : विश्वनाथ मोरे
कसबा बीड : करवीर तालुक्यातील कसबा बीड पुलावरून सकाळी दहाच्या सुमारास भोगावती नदीमध्ये एका वृद्धाने उडी घेतल्याची घटना घडली. उडी घेतलेल्या वृद्ध व्यक्तीस वाचवण्यात यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, करवीर तालुक्यातील बीडशेडमधील नागरिक गणपती बाबू सावंत (वय 70) यांनी भोगावती पात्रामध्ये उडी घेतली. यावेळी आकाश यादव व उदय वनीरे (कोल्हापूर) हे बीडशेडच्या दिशेने जात असताना सावंत यांनी पुलावरून उडी मारल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने आजूबाजूला असणाऱ्या युवकांना व येणाऱ्या जाणाऱ्यांना सावंत यांनी उडी मारल्याचे सांगितले.
नदीपात्रामध्ये उडी घेतलेले सावंत आजूबाजूला असलेल्या झाडात अडकल्याचे दिसून आले. ही घटना कळताच कसबा बीड पुलावर पाहणाऱ्यांची गर्दी झाली होती. उपस्थित युवकांनी आपत्ती निवारण कक्षाशी संपर्क केला. झाडाचा आधार घेऊन सुमारे एक तासभर सावंत झाडावर अडकलेले दिसत होते.
सदर घटनेची माहिती कळताच घटनास्थळी करवीर पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी, महे गावच्या सरपंच यांचे पती सचिन पाटील (साळव), माजी उपसरपंच निवास पाटील, विशाल मुळीक यासह अनेक युवक यांनी तात्काळ भेट देऊन सावंत यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले.
करवीर पंचायत समिती माजी सभापती राजेंद्र सुर्यवंशी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाचे प्रीतम केसरकर (सडोली दुमाला ), मधुकर मांगोरे (कसबा बीड ), विशाल भैरवनाथ मुळीक (महे ), कृष्णात सोरटे यांनी पाण्यात उडी घेऊन सावंत यांना सुखरूपपणे पाण्यामधून बाहेर काढण्यात यशस्वी झाले.
या मोहिमेमध्ये महत्त्वाची कामगिरी बजावणारे स्वतःचा जीव धोक्यात घालून पाण्यात उडी मारणारे राजेंद सुर्यवंशी, आपत्ती व्यवस्थापन विभागाकडील जवान प्रीतम केसरकर, विशाल मुळीक, मधुकर मांगोरे, कृष्णात सोरटे व इतर युवक यांनी सावंत यांना बाहेर काढण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडली. गणपती सावंत यांचा जीव वाचवल्याबद्दल कसबा बीड परिसरामध्ये त्यांचे कौतुक होत आहे.