Kas Pathar: कास तलाव परिसर होतोय दुर्दैवी घटनांचा साक्षीदार, सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
सुरक्षेच्या अभावामुळे अनेकांच्या मृत्यूचे कारणही ठरु लागला आहे
मेढा : पावसाळ्यात येणारी रंगबेरंगी फुले, मन मोहून टाकणारा निसर्ग आणि जोडीला खळखळणारा कास तलाव. कधीतरी निसर्गाच्या सानिध्यात जाऊन शरीराला, मनाला विसावा देत पुन्हा चार्ज होण्यासाठी सातारकरांसह राज्यभरातील पर्यटकांचे हक्काचे स्थान असलेला कास तलाव हा आता तेथील सुरक्षेच्या अभावामुळे अनेकांच्या मृत्यूचे कारणही ठरु लागला आहे.
शनिवारी कास तलावात बुडून एका छोट्या मुलाचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर आता सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. सध्या धरणाचे काम सुरु असून पर्यटकांची सुरक्षा रामभरोसे असून प्रशासनाने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे. ऐन उन्हाळ्यात सातारा शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या कास तलावामध्ये सध्या ७० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
सध्या उन्हाळी सुट्ट्या लागल्या असल्यामुळे पर्यटक कासला पाण्यामध्ये मौज करण्यासाठी व पार्ट्या करण्यासाठी येत असतात. कास धरण सातारा-बामणोली रस्यालगत असल्यामुळे काही तर पर्यटक कास धरणावरच गाडी घेऊन जातात. तर कास बंगला या ठिकाणी सुध्दा पर्यटक येऊन जेवणाच्या, दारूच्या पार्ट्या करत असतात.
पर्यटकांनी निसर्गात यावे आणि आनंद घ्यावा, यात गैर नाही. मात्र, कास परिसरात येऊन आनंद घेताना बेशिस्तपणा करणाऱ्या मद्यपिंकडून टाकण्यात आलेला कचरा परिसरात तसाच पडलेला असतो. त्यामध्ये दारूच्या बाटल्या, प्लास्टिकच्या पिशव्या मोठ्या प्रमाणावर पडलेल्या असतात.
याबाबत निसर्गप्रमी स्वतः कास परिसरात जाऊन स्वच्छता करतात. नागरिकांना कचरा न करण्याबाबत प्रबोधन करत असतात. हा प्रकार नेहमीच सुरु असतो. नागरिक कचरा टाकतात आणि निसर्गप्रेमी तो उचलून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करत असतात. कास तलाव हा सातारा नगर पालिकेच्या अधिकारात येतो. सातारा शहराला कास तलावचे पाणी पिण्यासाठी वापरले जाते.
त्यातच गेल्या २ ते ३ वर्षांपासून कास धरणाची उंची वाढविण्याचे काम सुरू आहे. ते अंतिम टप्प्यात असून काही ठिकाणी तर तलावातील पाण्यातील गाळ काढल्यातुळे पाण्याची खोली सुध्दा वाढलेली आहे. परंतु नगरपालिका प्रशासनाने कास धरण पाणी परिसरामध्ये काणेत्याही प्रकारची सुरक्षा किंवा संरक्षण कठडे वा सूचना देणारे फलक अशी कोणतीच सुरक्षा व्यवस्था केलेली नाही.
असंख्य पर्यटक कास परिसरात येतात. बिनधास्तपणे मद्यासह जेवणाच्या पार्ष्या करतात. दारू पिऊन धिंगाणा घालतात. धरणाच्या भिंतीवर गाड्या घेऊन जातात. पाण्यामध्ये पोहण्यासाठी जातात. अशा निष्काळजीपणामुळे अपघात घडतात. परंतु नगरपालिका कास तलावाच्या परिसराच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करत आहे, असे दिसून येते.
मुलाच्या मृत्यूस जबाबदार कोण?
खेळण्याच्या नादात छोटा मुलगा गेल्या शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास कास तलावाच्या परिसरात कुटुंबीयासमवेत क्रिकेट खेळण्याचा आनंद घेत असतानाच एक लहान मुलगा पाण्यामध्ये बुडून त्याचा मृत्यू झाला. याला जबाबदार कोण?
सध्या कास तलावमध्ये ७० टक्के पाणीसाठा असून उन्हाळाच्या सुटीमध्ये पाण्याचा आनंद घेण्याचा पर्यटक पोहण्याचा मोह आवरत नाही. त्यावर पालिका प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करताना दिसून येत नाही व कोणत्याही प्रकारची सुरक्षेच्या दृष्टीने कोणती खबरदारी घेतली जात नाही. यामुळेच या दुर्दैवी घटनेला सामोरे जावे लागले आहे.
कास परिसरात अनेक ठिकाणे धोकादायक
कास परिसरात अनेक ठिकाणे धोकादायक आहेत. लहान मुलगा बुडाल्यानंतर शिवेंद्रसिंहराजे भोसले रेस्क्यू टीमचे जवानांनी जीवाचे रान करून बचाव कार्य केले. परंतु, खोल पाण्यामुळे त्यांना लहानग्याचा जीव वाचवता आला नाही. कास तलाव परिसरात अशा घटनांचा धोका लक्षात घेता प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
लहान मुलांना पाण्याजवळ जाऊ देऊ नये. तलावात उतरणे टाळावे, असे प्रशासनाने सांगितले. या हृदयद्रावक घटनेने साताऱ्यातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. पार्ट्या करून पाण्यामध्ये पोहणे यासारखे प्रकार या ठिकाणी होतात. मग काही घटनांमध्ये मद्यधुंद असलेले पर्यटक पाण्यामध्ये बुडल्याच्या घटना घडतात. तर अनेक पहून जखमीडी होत असतात. या ठिकाणी सुरक्षेची गरज आहे.