कणकुंबी-पारवाड नागरिकांचा खानापूर हेस्कॉमवर मोर्चा
आठ-दहा दिवसांपासून अनेक गावांचा विद्युतपुरवठा खंडित होत असल्याने ग्रामस्थांत संताप : पिण्याच्या पाण्यासह अनेक समस्या : महिलांचा घागर मोर्चा
वार्ताहर /कणकुंबी
खानापूर हेस्कॉमच्या दुर्लक्षपणामुळे गेल्या आठ ते दहा दिवसांपासून कणकुंबी भागातील अनेक गावांचा विद्युतपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्याबरोबरच इतर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. खंडित वीजपुरवठ्यासंदर्भात हेस्कॉम अधिकारी, कर्मचाऱ्यांना वेळोवेळी माहिती दिली होती. परंतु त्यांनी याकडे साफ दुर्लक्ष केले होते. शेवटी या भागातील पारवाड व कणकुंबी ग्रामपंचायत व्याप्तीतील चिखले, चोर्ला, मान, सडा, हुळंद, चौकी, बेटणे, गवळीवाडा (हुंदीकोप) तसेच इतर गावातील जवळजवळ 200 हून अधिक नागरिकांनी व महिलांनी डोकीवर घागर घेऊन 22 मे रोजी हेस्कॉम कार्यालयावर मोर्चा काढून न्याय देण्याची मागणी केली.
वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन
कणकुंबी भागात दोनच लाईनमॅन असल्याने, दुरुस्ती करण्यास वेळ जास्त जात आहे. त्यासाठी उद्यापासून आणखी दोन अतिरिक्त लाईनमनची नेमणूक करण्याची ग्वाही देऊन जांबोटीला केईबीची गाडी उद्यापासून वीजपुरवठा सुरळीत होईपर्यंत ठेवण्यात येईल, असे सांगितले. जर वीजपुरवठा सुरळीत झाला नाही तर पुन्हा मोर्चा काढण्याचा इशारा पंचायत सदस्यांनी दिला आहे.
कणकुंबी भागात अनियमित विद्युत पुरवठ्यामुळे दरवर्षी नागरिकांचे अतोनात हाल होत असून, गेल्या आठ ते दहा दिवसांपासून कणकुंबी भागात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. दरवर्षी पावसाळ्dयात विद्युत पुरवठा सुरळीत नसल्याने मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. या संदर्भात कणकुंबी ग्राम पंचायतीतर्फे बेळगाव असिस्टंट कमिशनर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे की, खानापूर येथील हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांमुळे कणकुंबी भागातील जवळपास वीस ते पंचवीस खेड्यातील नागरिकांना दरवर्षी खंडित विद्युत पुरवठ्यामुळे आठ-आठ, पंधरा-पंधरा दिवस अंधारात रहावे लागते. वीज समस्या कायमचीच सोडविण्यासाठी त्वरित उपाययोजना करावी, अशा मागणीचे निवेदन कणकुंबी ग्रामपंचायतीच्या अध्यक्षा दीप्ती गवस, उपाध्यक्षा नीलिमा महाले, माजी अध्यक्ष रमेश खोरवी व मंगेश नाईक, सदस्या आरती नाईक, शकुंतला गस्ती, सुप्रिया हरिजन व इतर सदस्यांनी बेळगाव जिल्हा असिस्टंट कमिशनरना सादर केले.