हत्तीचा बंदोबस्त करण्याची कबनाळी ग्रामस्थांची मागणी
वायंगणी पिकाचा फडशा : दिवसा जंगलात, रात्री शिवारात
खानापूर : तालुक्यातील कबनाळी गावात गेल्या दहा दिवसांपासून एका हत्ती कायम शेतात ठाण मांडून राहिला असून, उन्हाळ्यातील वायंगणी भातपिकाचा फडशा पाडला. गेल्या दहा दिवसापासून हत्ती सायंकाळ झाली की, कबनाळी गावच्या वेशीत असलेल्या वायंगान भाताच्या पिकात घुसून फडशा पाडत आहे. ऐवढेच नव्हे तर रात्रीच्यावेळी गावात प्रवेश करत असल्याने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत वनखात्याने गांभीर्याने घेतले नसल्याने सोमवारी कबनाळी ग्रामस्थांनी खानापूर आरएफओ नागराज बाळेहोसूर यांची भेट घेऊन हत्तीचा बंदोबस्त करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन दिले
...तर वन कार्यालयाला घेराव
यावेळी खानापूर तालुका ग्राम पंचायत संदस्य संघटनेचे अध्यक्ष विनायक मुतगेकर, ज्येष्ठ नेते यशवंत बिरजे, काँग्रेस नेत्या भारती पाटील, अॅड. ईश्वर घाडी व कबनाळी गावचे ग्रामस्थ उपस्थित होते . जर हत्तीचा बंदोबस्त केला नाही तर गावचे नागरिक वनखात्याच्या कार्यालयाला घेराव घालून आंदोलन करण्याचा इशारा यावेळी उपस्थितांनी दिला. निवेदनाचा स्वीकार आरएफओ नागराज बाळेहोसूर यानी तातडीने हत्तींच्या बंदोबस्त करण्यासाठी वनअधिकारी विनायक पाटील व इतर कर्मचाऱ्यांना कबनाळी येथे रवाना केले आहे. त्यामुळे कबनाळी गावच्या नागरिकांतून समाधान पसरले आहे.