झारखंड म्हणजे भ्रष्टाचाराचे एटीएम
काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चासाठी झारखंड राज्य हे जणू काही भ्रष्टाचाराचे ‘एटीएम’ आहे. या दोन्ही पक्षांनी या राज्यातील जनतेची केवळ लूट केली असून राज्याचा विकास या भ्रष्टाचारामुळे थंडावला आहे. आता मतदारांनी या दोन्ही पक्षांना लक्षात राहील असा धडा शिकविण्याचा निर्धार केला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जामतारा येथे प्रचार सभेत केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंसाचारी नक्षलींचा पुरता नायनाट केला आहे. झारखंडच्या बूढा पहाड भागात आश्रय घेतलेल्या लाल विद्रोहींना संपवून त्यांनी येथील आदीवासी समुदायांना न्याय दिला आहे. 10 वर्षांपूर्वी काँग्रेसच्या सत्ताकाळात आदीवासींच्या कल्याणासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात केवळ 25,000 कोटी रुपयांची तरतूद केली जात असे. आज ही तरतूद 1 लाख 25 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहचली आहे. देशाच्या आदीवासी बहुल भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा केल्या जात असून आदीवासींच्या जीवनमानात परिवर्तन घडविण्याचे कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार करीत आहे. दुभती जनावरे ही आदीवासींच्या उत्पन्नाची महत्वाची साधने आहेत. काँग्रेसच्या सत्ताकाळात त्यांची मोठ्या प्रमाणावर तस्करी करण्यात येत असे. आता ती पुष्कळ प्रमाणात थांबली आहे. आमच्या सरकारच्या धोरणांमुळे देशातील पशुधनाचे संरक्षण होत आहे. यामुळे आदीवासी समाजाचा आम्हाला पाठिंबा आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
लालू यादवांमुळे सर्व समाजांचा तोटा
लालू प्रसाद यादव यांच्या सत्ताकाळात त्यांनी अन्य मागासवर्गीय किंवा यादव समुदाय यांच्यापैकी कोणाचेही कल्याण केले नाही. त्यांनी केवळ न केलेल्या कामांचा गाजावाजा केला. तेवढ्या भरवशावर ते निवडणूक जिंकू शकणार नाहीत, अशी टीका अमित शहा यांनी बिहारमधील आरा मतदारसंघात बोलताना केली.
आर. के. सिंग यांच्यासाठी प्रचार
आरा मतदारसंघात केंद्रीय मंत्री आर. के. सिंग निवडणूक स्पर्धेत आहेत. त्यांच्यासाठी अमित शहा यांची प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. लालू यादव यांचे जंगलराज संपल्यानंतरच बिहारमध्ये खऱ्या अर्थाने प्रगतीची पहाट उगविली आहे. लालू यादवांच्या काळात झालेले अनाचार बिहारमधील जनता विसरलेली नाही, असाही टोला अमित शहा यांनी भाषणात लगावला.