For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जयंत चौधरींचा पक्ष रालोआमध्ये सामील

06:11 AM Feb 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
जयंत चौधरींचा पक्ष रालोआमध्ये सामील
Advertisement

पश्चिम उत्तर प्रदेशातील राजकीय समीकरणे बदलणार

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

आरएलडी प्रमुख जयंत चौधरी यांनी अखेर सोमवारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये (एनडीए) सामील होण्याची घोषणा केली आहे. आता जयंत चौधरी आरएलडी पक्ष भाजपसोबत गेल्यामुळे आता पश्चिम उत्तर प्रदेशातील निवडणूक समीकरणेही पूर्णपणे बदलणार आहेत. आता आगामी लोकसभा निवडणुकीत जाट व्होटबँकही भाजपच्या दिशेने येताना दिसणार आहे. गेल्याच आठवड्यात जयंत चौधरी यांच्या राष्ट्रीय लोकदल या पक्षाने आघाडीतून बाहेर पडण्याची घोषणा करतानाच भारतीय जनता पक्षाशी हातमिळवणी करण्याचे स्पष्ट संकेत दिले होते. त्यानुसार सोमवारी त्यांनी अधिकृतपणे रालोआमध्ये दाखल होण्याची घोषणा केली.

Advertisement

गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकदल या पक्षांमध्ये यासंबंधीची चर्चा केली जात होती. यापूर्वी चौधरी हे समाजवादी पक्षाचे नेते अखिलेशसिंग यादव यांच्यासह विरोधी पक्षांच्या आघाडीत होते. तथापि, यादव यांच्याशी त्यांचे काही मुद्द्यांवर मतभेद झाले आहेत. जागावाटप आणि आघाडीची निष्क्रीयता हे वादाचे मुद्दे असल्याचे सांगितले जात आहे.

लोकसभेच्या दोन जागा मिळविणार

राष्ट्रीय लोकदलाचा भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत प्रवेश निश्चित झाला आहे. त्यानुसार पक्षातील वरिष्ठांशी झालेल्या चर्चेनुसार लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकदल या पक्षाला बाघपत आणि बिजनौर या दोन जागा दिल्या जाणार असल्याचे समजते. तसेच एका राज्यसभेच्या जागेचे आश्वासनही या पक्षाला देण्यात आले आहे.

राष्ट्रीय लोकदल हा पक्ष माजी दिवंगत पंतप्रधान ‘भारतरत्न’ चौधरी चरणसिंग यांच्याशी संबंधित आहे. नुकताच केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे मसिहा माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची घोषणा केली होती. राष्ट्रीय लोकदल या पक्षाचा मूळ पक्ष असणाऱ्या भारतीय लोकदल या पक्षाची स्थापना चरणसिंग यांनी साठच्या दशकात केली होती. पुढे तो पक्ष जनता पक्षात विलीन झाला होता. जनता पक्षची छकले उडाल्यानंतर तो निर्माण झाला आहे.

जाट समुदायावर प्रभाव

राष्ट्रीय लोकदल पक्षाचा पश्चिम उत्तर प्रदेशात मेठ्या संख्येने असणाऱ्या जाटांवर प्रभाव आहे. उत्तर प्रदेशातील 80 लोकसभा मतदारसंघांपैकी 27 मतदारसंघात जाटांची संख्या लक्षणीय असल्याचे बोलले जाते. हा पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीत आल्याने पश्चिम उत्तर प्रदेशात आघाडीला लाभ होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Advertisement
Tags :

.